राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष लागून असलेल्या मतदारांसाठी आणि राजकीय पक्षांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात नवा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
कधी होणार निवडणूक?
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या तारखेत बदल झाल्यामुळे साहजिकच मतमोजणीच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांचा निकाल आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केला जाईल.
निवडणूक कार्यक्रमातील बदलाचे मुख्य कारण
राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी अधिकृत कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते चिन्हांच्या वाटपापर्यंतची सर्व प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झाली आहे.
मात्र, 28 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राज्य शासनाने त्यांच्या सन्मानार्थ 28 जानेवारी ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत राज्यात शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सरकारी कामकाज आणि निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाल्याने आयोगाने मतदानाचे टप्पे पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाची मुदत आणि सुधारित वेळापत्रक
या निवडणुका पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 नंतर केवळ 2 आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे. ही कायदेशीर मर्यादा लक्षात घेऊनच आयोगाने नवीन तारखा निश्चित केल्या आहेत. सुधारित वेळापत्रकाची अधिकृत सूचना 31 जानेवारी 2026 रोजी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे. या निर्णयामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रचारासाठी अतिरिक्त 2 दिवसांचा अवधी मिळाला आहे.
मतदान आणि मतमोजणीची नवी वेळ
नवीन वेळापत्रकानुसार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल. मतदानाच्या 48 तास आधी म्हणजेच 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता जाहीर प्रचाराची तोफ थंडावणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होताच संबंधित निवडणूक क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल. तसेच, निवडून आलेल्या नवीन सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जातील.











