सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक उपाययोजना करूनही नागरिकांकडून येथील वांग नदीवरील धोकादायक पुलाचा विविध कारणांसाठी वापर सुरूच आहे.कपडे, दुचाकी धुणाऱ्यांसह नदीवर पोहायला येणाऱ्यांची गर्दी पुलावर वाढतच चालल्याने दुर्घटनेची भीती वाढली आहे.
ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावर येथून जवळच असलेल्या वांग नदीवर पूर्वी बांधलेला कमी उंचीचा पूल आहे. पुलाखाली नदीच्या दक्षिण- उत्तर प्रवाहांचा संगम झाल्याने पावसाळ्यात पाण्याचा ओघ असतो. त्यामुळे पावसाळ्यातील बरेच दिवस पूल पाण्याखालीच असतो. पुराबरोबर मोठी झाडे वाहत येऊन पुलाला धडकल्याने तो कमकुवत झाला आहे. पुलाच्या धोकादायक स्थितीमुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून १५ वर्षांपूर्वी जुन्या पुलाच्या शेजारी नवीन उंच पूल उभारून त्यावरून वाहतूक सुरू झाली असली, तरी जुना धोकादायक पूल आजतागायत तेथेच उभा आहे. सध्या त्यावरून वाहतूक बंद असली, तरी गणेशमूर्ती विसर्जन तसेच कपडे व वाहने धुण्यास आणि रक्षाविसर्जनास होणारी लोकांची गर्दी पाहता दुर्घटना घडण्याची भीती आहे. काही दिवसांपूर्वीच धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या सुरुवातीलाच खांब उभारून त्यावर जाळी बसवली होती. पुलावर कुणीही प्रवेश करू नये, हा त्यामागे उद्देश होता; परंतु त्याचाही काही उपयोग झालेला नाही. ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशीच स्थिती पुलावर दृष्टीस पडते आहे.











