नीरा नदी व भीमा नदीवरील बंधारे सध्या पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर काही दिवस तरी पिकांना जीवदान मिळणार आहे. तर जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याची सोय झाली असल्याचे शेतकऱ्यांसह महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
भीमा नदीवरील नरसिंहपूर, टणू व भाटनिमगाव बंधाऱ्यात उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यातून पाणी अडवून बंधारे तुडुंब भरून घेतले आहेत. त्यामुळे नदीवरील इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, टणू, पिंपरी बुद्रूक, गणेशवाडी, बावडा, भांडगाव, भाटनिमगाव, बाभूळगाव तर माढा तालुक्यातील शेवरे, चांदज, टाकळी, गारअकोले, रुई, आलेगाव व रांजणी गावातील शेकडो एकर शेतातील पिकांना उन्हाळ्याच्या तोंडावर काही दिवसांसाठी जीवदान मिळणार आहे.
नीरा नदीवरील संगम, ओझरे, लुमेवाडी, अकलाई, सराटी आदीसह बंधारे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणी अडवून भरून घेण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठावरील पिण्याच्या पाणी योजनांना दिलासा मिळाला आहे. तसेच जनावरांच्या चारा व पाण्याची मोठी सोय होणार असल्याची शेतकरी, नागरिक व महिलांनी सांगितले. तसेच नीरा नदीकाठावरील इंदापूर तालुक्यातील सराटी, लुमेवाडी, गोंदी, गिरवी, नरसिंहपूर, निरनिमगाव, चाकाटी तसेच माळशिरस तालुक्यातील संगम, गणेशगाव, बिजवडी, सवतगाव, तांबवे, माळीनगर, अकलूज आदी गावांतील हजारो एकरावरील उभ्या पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, भीमा नदी पाण्याने तुडुंब भरली असली तरी विजेच्या लपंडावाने पिकांना पाणीच देता येत नाही. त्यामुळे विद्युत मोटारी बंद राहत असल्याने केबल, स्टार्टर व मोटारी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे.
विहिरी, कूपनलिकांच्या पाण्यात वाढ
दरम्यान, भीमा नदीच्या पाण्यामुळे विहिरी, कूपनलिका, तलावाच्या पाण्यात वाढ होणार आहे. तर नरसिंहपूर, टणू व भाटनिमगाव बंधारे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे नदीवरील इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, टणू, पिंपरी बुद्रूक, गणेशवाडी, बावडा, भांडगाव, भाटनिमगाव, बाभूळगाव तर माढा तालुक्यातील शेवरे, चांदज, टाकळी, गारअकोले, रुई, आलेगाव व रांजणी गावातील शेकडो एकर शेतातील पिकांना काही दिवसांसाठी जीवदान मिळणार आहे. इंदापूर तालुक्यातील नीरा व भीमा नद्यांच्या परिसराला पाण्यामुळे बागायती पट्ट्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.











