हिंदू धर्मात मृत्यूनंतर काही विधी-परंपरा पाळल्या जातात, पण अनेकांना त्याचा अर्थ माहीत नसतो. मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे, ते कोणीही टाळू शकत नाही. हिंदू धर्मात मृत्यूंनतर केले जाणारे संस्कार महत्त्वाचे मानले जातात.
हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा विधी म्हणजे अंत्यसंस्काराच्या वेळी पाण्याने भरलेले मडके फोडणे. या परंपरेमागे धार्मिक, ज्योतिषीय आणि व्यावहारिक कारणे आहेत. ही परंपरा आपल्याला सांगते की, मृत्यू हा अंत नसून एक नवीन सुरुवात आहे. ज्याप्रमाणे पाणी मडक्यातून वाहून जमिनीत मिसळते, त्याचप्रमाणे आत्मा देखील आपल्या कर्मांनुसार पुढे जातो.
अंत्यसंस्कारातील मडके फोडण्याची प्रक्रिया – हिंदू शास्त्रानुसार, अंत्यसंस्काराचे सर्व विधी योग्य जाणकार किंवा ब्राह्मणाच्या मार्गदर्शनाखाली करायला हवे. मुख्य अग्नी देणारी व्यक्ती मातीचे मडके खांद्यावर घेऊन चितेभोवती प्रदक्षिणा घालते. मडक्यात थोडे पाणी भरलेले असते आणि त्याला एक छिद्र पाडले जाते. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ते मडके पाठीमागे टाकून फोडले जाते. मडके फुटताच पाणी विखुरले जाते, हा अंत्यसंस्कारातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
ज्योतिषीय आणि धार्मिक महत्त्व – ज्योतिषीय दृष्टीकोनातून पाहिले तर मातीचे मडके हे मृत शरीराचे प्रतीक आहे आणि त्यातील पाणी आत्म्याचे प्रतीक आहे. प्रदक्षिणेदरम्यान पाण्याची धार किंवा थेंब हळूहळू पडणे म्हणजे शरीर आणि आत्म्याचा संबंध आता हळूहळू सुटत आहे. जेव्हा मडके फुटते, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आत्मा आता शरीरापासून पूर्णपणे मुक्त झाला असून आपल्या पुढील प्रवासासाठी स्वतंत्र झाला आहे. शरीर हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांनी बनलेले असते. मडके फोडण्याची प्रक्रिया म्हणजे आता शरीर पुन्हा या पंचतत्त्वांमध्ये विलीन होणार आहे. हे विधी मृत व्यक्तीचे सांसारिक मोह आणि नात्यांचा अंत दर्शवतात.
व्यावहारिक कारणे – धार्मिक कारणांशिवाय या परंपरेमागे काही व्यावहारिक उद्देश देखील होते. प्राचीन काळी अंत्यसंस्कार उघड्यावर स्मशानभूमीत होत असत. पाण्याने भरलेले मडके फोडल्यामुळे चितेच्या आसपासची जमीन ओली व्हायची, ज्यामुळे चितेची आग बाहेर पसरण्याचा धोका कमी व्हायचा. अशा प्रकारे ही क्रिया सुरक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाची मानली जात होती.
सामाजिक आणि भावनिक महत्त्व – मडके फोडणे हे केवळ विधीचे नाव नाही, तर मृत व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्याची ती एक पद्धत आहे. ही प्रक्रिया कुटुंब आणि समाजाला याची जाणीव करून देते की जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचे नियम आहेत. नाती, मोह आणि सांसारिक बंधनातून मुक्त होऊन जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याची ही एक संधी असते, असेही मानले जाते.











