येथील महामार्गालगत असलेल्या कचरा वर्गीकरण शेडमध्ये सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे साठलेल्या कचऱ्याने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते.
अग्निशामक दलाने दीड तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी आणि भाजपच्या वतीने प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले.
बालेवाडी सेवा रस्त्यावरील या केंद्रात कचरा वेळेत उचलला जात नसल्याने कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला. रात्री कर्मचारी नसल्याने मोठी जीवितहानी टळली असली, तरी आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. बाणेर अग्निशामक दलाचे दोन बंब आणि एका पाण्याच्या टँकरच्या साह्याने आग विझवली.
प्रशासनाच्या या निष्काळजीपणाचा निषेध करण्यासाठी नगरसेविका रोहिणी चिमटे, गणेश कळमकर, मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कचऱ्याच्या समस्येकडे वारंवार लक्ष वेधले होते, मात्र ठोस कारवाई न झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे आंदोलकांनी सांगितले.











