ठाणे जिल्ह्यातील जीवन वाहिनी मानली जाणारी उल्हास नदीतील प्रदुषण थांबताना दिसत नाहीत. बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात वाहनचालक यथेच्छ वाहन धुलाई करतात. याच नदीच्या पात्रात निर्माल्यही मोठ्या प्रमाणावर टाकले जाते.
सध्या नदीच्या पाण्यावर जलपर्णीचे गुच्छे वाहताना पहायला दिसत आहेत. अनेक नागरिक सायंकाळी येथे फेरफटका मारण्यासाठी कुटुंबासह येतात. मात्र त्यांना या वाहनचालक, अस्वच्छतेचा सामना करावा लागतो.
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणारी उल्हास नदी अनेक अर्थांनी महत्वाची आहे. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक शहरे, ग्रामपंचायती अवलंबून आहेत. बारवी धरणातून निघणारे पाणी बारवीच्या प्रवाहातून थेट उल्हास नदीला येऊन मिळते. उल्हास नदीवर असलेल्या बंधाऱ्यांवरून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया केली जाते आणि पुढे हेच पाणी शहरांना, उद्योगांना वापरासाठी दिले जाते. मात्र या नदीच्या प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे.
बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात बॅरेज बंधाऱ्यापुढे औद्योगिक सांडपाणी मिसळले जात असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यात शहराच्या सांडपाण्याचीही त्यात भर पडते. मात्र नागरिकही यात भर घालत असल्याचे चित्र आहे. बदलापुरातील चौपाटी परिसरात सायंकाळी, शनिवार, रविवारी अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. मात्र काही नागरिक आपल्यासोबत आणलेल्या दुचाकी थेट नदीच्या पात्रात टाकून यथेच्छ धुलाई सुरू करतात. तर निर्माल्य टाकणाऱ्यांची संख्या कमी नाही. निर्माल्यासोबतच देवांच्या जुन्या प्रतिमा, मुर्तीही येथेच विसर्जीत केल्या जातात. त्यामुळे अनेकदा मुर्ती, प्रतिमा फेरफटका मारणाऱ्यांच्या पायाखाली येतात. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करतात. उल्हास नदीवर नवा पूल तयार करण्यात आला आहे. अनेक नागरिक या पुलावर येऊन थेट निर्माल्य खाली नदी पात्रात सोडतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. काही महिन्यांपूर्वी येथे निर्माल्य कलश लावण्यात आले होते. मात्र यात कचरा टाकण्यासाठी किंवा नदीत निर्माल्य तसेच इतर कचरा रोखण्यासाठी येथे कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे नदीच्या प्रदुषणात भर पडते आहे.
उल्हास नदी पात्रात सातत्याने सांडपाणी मिसळले जात असल्याने यात जलपर्णी तयार होते. या जलपर्णीमुळे अनेकदा अनेक महिने नदीचे पात्र व्यापले जाते. त्याचा पाणीपातळीवर परिणामही होता. आता पुन्हा नदी पात्रावर जलपर्णीचा थर साचू लागला आहे. जलपर्णीच गुच्छे नदीच्या पाण्यावर वाहत वाहत बंधाऱ्यापर्यंत जात आहेत. याचा येथील पाणी उचल केंद्रावर परिणाम होतो.










