पुणे:- बदलत्या काळानुसार पुणे शहराचा विस्तार होतोय, हे पुणेकरांनी लक्षात घेतले आहे. ज्याप्रमाणे मुंबईचे नवी मुंबई झाले, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण केले, नागपूर येथे एक हजार एकराचे नवीन नागपूर केले, त्याप्रमाणे पुण्यालाही नवीन महापालिका करण्याची गरज आहे,’ असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ‘
शहराचा वेगाने विस्तार
शहर वाढत आहे. लोकसंख्या वाढली आहे. रस्ते कमी पडत आहेत. १९८२ पासून पुण्यात येत होतो. त्या वेळी शहराची लोकसंख्या १२ लाख होती. आता ती ७२ लाखांवर गेली आहे. जगात कोणते शहर इतके वेगाने वाढले आहे का? वाहने झाली ५३ लाख. दिवाळी पाडव्याला एकाच दिवशी रस्त्यावर २३ हजार नवीन वाहने आली. रस्ते रुंद होण्याला मर्यादा आहेत.
पुणे शहराचा विस्तार वाढतो आहे, याचा सर्व पुणेकरांनी एकत्र विचार केला पाहिजे. २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगेचा नगररचना प्रकल्प (टीपी स्किम) मंजूर केला आणि सरकार गेले. आता परत सरकार आले. त्याला मंजुरी मिळाली. पाच लाख लोकसंख्या तिकडे जाईल. बाणेर, बालेवाडी झाले, तेव्हा ते गाव होते. मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंक सुरू आहे. त्यामुळे दररोज सव्वादोन तासांत मुंबईपर्यंत जाता येईल. तेव्हा म्हाळुंगेपर्यंत राहायला गेलो तर काय फरक पडतो? पण आम्ही कोथरूडलाच राहणार, अशी मानसिकता आहे.











