पुण्यातील बालाजीनगर परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाने शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात सहकारनगर पोलिसांनी कुख्यात आंदेकर टोळीतील सदस्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
अक्षय म्हस्के याचा खून करण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या अक्षय म्हस्केवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर सहकारनगर पोलिस ठाण्यात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, रामजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर यांच्यासह आणखी पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्न, कट रचणे आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने अक्षय म्हस्के याला लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. बदला घेण्याच्या भूमिकेतून नियोजनबद्ध कट रचून अक्षय म्हस्केवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.
घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध सुरू केला आहे. शहरातील विविध भागात छापेमारी करण्यात येत असून संशयितांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. या प्रकरणाचा तपास सहकारनगर पोलिसांकडून सुरू असून लवकरच काही आरोपींना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बालाजीनगर गोळीबार प्रकरणामुळे पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला असून या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.











