दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक पैठण शहरातील पवित्र गोदावरी आज वाढते प्रदूषण आणि अनियोजित विकासामुळे अस्तित्वासाठी झुंज देताना दिसत आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या नदीच्या पुनरुज्जीवनाकडे नगरपालिका प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पैठण शहराची सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक ओळख गोदावरी नदीशी घट्ट जोडलेली आहे. संतांची परंपरा, घाट संस्कृती आणि धार्मिक विधींमुळे या नदीला विशेष महत्त्व आहे. मात्र गेल्या काही वर्षांत शहराच्या वाढत्या विस्तारासोबतच गोदावरीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.
शहरातील तब्बल १८ नाल्यांमधून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यातच प्लॅस्टिक कचरा व अस्वच्छतेमुळे नदीचे स्वरूप विद्रूप होत आहे. ड्रेनेज लाइन्स थेट नदीत मिसळत असल्याने नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. धार्मिक विधींसाठी येणाऱ्या भाविकांनाही अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमा राबविल्या जात असल्या तरी त्या केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. नदीपात्रातील कचरा, अस्वच्छता हटविणे आणि काही दिवस स्वच्छता राखणे एवढ्यापुरतेच हे उपक्रम मर्यादित राहत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
“गोदावरी ही केवळ एक नदी नसून पैठणच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. संत एकनाथ महाराजांच्या जन्मभूमीशी जोडलेल्या या नदीचे पावित्र्य आणि अस्तित्व जपणे ही नगरपालिका व प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”











