नऊ वर्षांपूर्वी उघड्या मॅनहोलमध्ये पडून प्रख्यात डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू ओढवला होता अशी दुर्घटना पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, असा इशारा सभागृह नेते गणेश खणकर यांनी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाला दिला.
मुंबईत अनेक ठिकाणी नाल्यांवरच्या ढापा तुटल्या आहेत, निघाल्या आहेत. या ढापा बसवाव्यात अशी मागणी खणकर यांनी केली.
पावसाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असून नालेसफाईची कामे केवळ ५० ते ६० टक्के झाली आहेत. या कामांच्या संथगतीवर मंगळवारी स्थायी समितीमध्ये सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सभागृह नेते गणेश खणकर यांनी याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. नाल्यांच्या काठावर झोपड्यांचे अतिक्रमण वाढले असून त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पदधतीने होत नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
नाल्यांवरील अतिक्रमणांचे उपग्रह सर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी केली. दहा वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या नाल्यांच्या उपग्रह छायाचित्रांची तुलना केली तर अतिक्रमणांचे खरे स्वरूप उघड होईल, असाही मुद्दा त्यांनी मांडला. नालेसफाईच्या पाहणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर .भाजपने गेल्या काही दिवसांपासून नालेसफाईच्या पाहणीचे दौरे केले.
या पाहणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा खणकर यांनी केला. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये राडारोडा टाकण्यात आला असून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचलेला आढळला. तसेच गोवंडी परिसरातील नाल्यांवर झोपड्यांचे अतिक्रमण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. तर काही ठिकाणी नाल्यांवर ढापा तुटलेल्या आढळलेल्या होत्या.या ढापा वेळच्यावेळी बसवणे आवश्यक आहे. नाहीतर नाल्यात पडून दुर्घटना होण्याची शक्यता असते. डॉ. अमरापूर यांच्यासारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी जबाबदारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
सन २०१७ मध्ये ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीच्या दिवशी हिंदमाता परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून प्रख्यात डॉ. दीपक अमरापूरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे पालिका प्रशासनावर प्रचंड टीका झाली होती. अमरापूरकर यांच्यासारख्या डॉक्टरांचा यापद्धतीने मृत्यू व्हावा ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. माणूस जातो आणि त्याच्याबरोबर त्याचे ज्ञानही जाते, अशा शब्दात खणकर यांनी अमरापूरकर यांची आठवण सभागृहाला करून दिली.
अमरापूरकर यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. मॅनहोल उघडे ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी पाच रहिवाशांना अटक केली होती. या पाच जणांनी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मॅनहोलचे झाकण उघडले होते. या दुर्घटनेनंतर पर्जन्यजलवाहिन्यांच्या मनुष्य प्रवेशिकांमध्ये आतल्या बाजूने जाळ्या लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जाळ्याच काय अनेक ठिकाणी वरच्या ढापाही बसवलेल्या नसल्याकडे खणकर यांनी लक्ष वेधले.










