तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून चार दिवस उलटले आहेत. मात्र येथील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. अभिनेता विजय थलपती याच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली असली, तरी बहुमतासाठी त्यांची कसरत सुरू आहे.
त्यांनी ११८ आमदारांचं समर्थन असल्याचं पत्रही राज्यपालांना दिलं. मात्र मध्यरात्री गेम पलटला आहे. थलपतीने राज्यपालांना दिलेलं पत्र बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
एएमएमके (AMMK) प्रमुख टीटीव्ही दिनकरन यांनी विजय यांच्या पक्षावर गंभीर आरोप केले असून, राज्यपालांना आपल्या पक्षाचे बनावट समर्थन पत्र सादर केल्याचा दावा केला आहे.
टीटीव्ही दिनकरन यांच्या मते, त्यांच्या पक्षाचे एकमेव आमदार एस. कामराज यांच्या स्वाक्षरीचे एक बनावट पत्र TVK ने राज्यपालांना सादर केलं आहे. दिनकरन यांनी स्पष्ट केले की, “माझे आमदार कामराज यांनी एआयएडीएमके (AIADMK) आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार पलानीस्वामी यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. मी स्वतः राज्यपालांची भेट घेऊन त्यांना मूळ पत्र दाखवले आहे.”
दिनाकरन यांनी सांगितलं की,TVK ने सादर केलेलं पत्र ही मूळ पत्राची बनावट फोटोकॉपी आहे. हा फसवणुकीचा प्रकार असून याविरोधात आम्ही गुन्हेगारी तक्रार दाखल करत आहोत. एआयएडीएमकेच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार स्थापनेचा दावा करू आणि इतर पक्षांचा पाठिंबा मिळवू.
दिनाकरन यांनी आरोप केल्यानंतर विजय यांच्या पक्षाने (TVK) प्रत्युत्तर म्हणून आमदार एस. कामराज यांचा एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये कामराज हे विजय यांना पाठिंबा देण्याबाबत बोलताना दिसत आहेत. “टीटीव्ही दिनकरन यांच्या संमतीनेच मी हा निर्णय घेतला आहे,” असे कामराज या व्हिडीओत म्हणत आहेत.
मात्र, या व्हिडीओनंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. दिनाकरन यांनी आपले आमदार कामराज बेपत्ता असल्याची तक्रार राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर मध्यरात्री उशिरा दिनकरन स्वतः आमदार कामराज यांना सोबत घेऊन राजभवनात पोहोचले आणि त्यांनी एआयएडीएमकेलाच आपला पाठिंबा असल्याचे पत्र राज्यपालांना सुपूर्द केले.
या राजकीय नाट्यानंतर टीटीव्ही दिनकरन यांनी चेन्नईतील गिंडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. TVK पक्षाने बनावट पत्र सादर करून फसवणूक केल्याची औपचारिक तक्रार त्यांनी पोलिसांत दिली आहे. यामुळे आता विजय यांच्या पक्षापुढील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.











