तमिळनाडूच्या कोईम्बतूरमधील एक १० वर्षांची मुलगी २१ मे पासून बेपत्ता होती. मुलीचा मृतदेह कन्नमपलयम तलावाजवळ आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीटाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, नागपट्टिनम येथील ३३ वर्षीय आरोपी कार्तिक आणि त्याचा सहकारी मोहन राज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलगी बाहेर खेळत असताना तिचे अपहरण करण्यात आले होते आणि नंतर तिची हत्या झाली.
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. मृत मुलीचे काका पलानीसामी यांनी सांगितले, गुरुवारी (२१ मे) रात्री मुलगी बेपत्ता झाल्याचे आम्हाला समजले. ही माहिती मिळाल्यानंतर मुलीचे कथितरित्या अपहरण झाले असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
घराजवळील दुकानात सामान आणायला गेली असताना तिचे अपहरण करण्यात आले होते. नेमके काय झाले, हे अजूनही आम्हाला सांगितले गेले नाही. तिचा मृतदेहही आम्ही अजून पाहिला नाही. पोलीस सांगतात चौकशी सुरू आहे, असेही पलानीसामी म्हणाले आहे.
या भयानक घटनेवर नवे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या घटनेमुळे आपल्याला धक्का बसला असून सदर घटना अमानुष आणि अक्षम्य असल्याचेही त्यांनी म्हटले. सदर कृत्य आपल्या समाजात कधीही सहन केले जाणार नाही, असेही ते म्हणाले.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री विजय म्हणाले, ‘कोईम्बतूरमध्ये एका १० वर्षांच्या मुलीबरोबर घडलेल्या भीषण घटनेमुळे मनाला प्रचंड वेदना झाल्या. अशा प्रकारची अमानुष आणि अक्षम्य गुन्हेगारी कृत्ये आपल्या समाजात कधीही सहन केली जाणार नाहीत. आपल्या लाडक्या मुलीला गमावणाऱ्या पीडित कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून तीव्र संवेदना व्यक्त करतो. या प्रकरणाशी संबंधित दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.’
तसेच या घटनेसाठी जबाबदार असलेल्या सर्वांना आवश्यक कारवाई केली जाईल, असेही आश्वासन मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी पीडितेच्या कुटुंबियांना दिले.
सदर घटना घडल्यानंतर मृत मुलीचे पालक, नातेवाईक आणि स्थानिकांनी आरोपींवरील कठोर कारवाईच्या मागणीसाठी सुलूर मार्गावर आंदोलन केले. पोलीस महानिरीक्षक (पश्चिम विभाग) आर. व्ही. रम्या भारती यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि या घटनेची चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन दिले.
पीडितेचे नातेवाईक सेंथिल कुमार यांनी एएनआयशी बोलताना म्हटले की, पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीने घटनास्थळावरून दूर ढकलले. तडजोडीसाठी मुलीच्या पालकांना सुलूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आम्ही मुलीच्या पालकांना कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी न करण्यास सांगितले आहे. आम्हाला या प्रकरणी न्याय हवा आहे.











