बीड येथे कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाची लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १० लाख रुपयांना फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलीचा नकार असतानाही साखरपुडा उरकला आणि नंतर “२५ लाख रुपये द्या, नाहीतर वर्दी उतरवू आणि हातपाय तोडू,” अशी धमकी दिल्याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात मुलीच्या कुटुंबातील १० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.अंगद शाहूराव निंबाळकर (वय ३०, रा. चकलांबा) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीचे भाऊ पवन निंबाळकर हे बीड येथे पीएसआय आहेत. मातोरी (ता. शिरूर कासार) येथील ज्ञानेश्वर जरांगे यांची मुलगी गीतांजली हिचे स्थळ आल्यानंतर, १४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचा साखरपुडा झाला. फिर्यादनुसार यात निंबाळकर कुटुंबाने सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व कपड्यांवर ४ लाख रुपये खर्च केले. मात्र, १५ मार्च २०२६ रोजी गीतांजलीने पवन यांना फोन करून, “माझ्या इच्छेविरुद्ध लग्न जमवले असून माझ्या मनात भावना नाहीत,” असे स्पष्ट सांगितले.
निंबाळकर कुटुंबाने मुलीच्या नातेवाईकांना चकलांबा येथे बोलावून चर्चा केली असता, गीतांजलीने सर्वांसमोर लग्नाला नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या सरसराम जरांगे, तात्याराम जरांगे, रामप्रसाद जरांगे, प्रकाश जरांगे आणि ज्ञानेश्वर जरांगे यांनी पीएसआय पवन यांना धमकावले. “त्याला रस्त्यात गाठून हातपाय तोडू. आम्ही जरांगे आहोत! आमचा २५ लाख खर्च झालाय, तो द्या; नाहीतर तुझी खुंटीला टांगलेली वर्दी तशीच राहील, ड्युटी करू देणार नाही,” अशी धमकी दिली.
त्यानंतर आसाराम जरांगे याने पवनच्या आजोबा आणि मामांना फोन करून २५ लाखांची खंडणी मागितली. साखरपुडा व लग्नाच्या नावाखाली एकूण १० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चक्लांबा पोलिसांनी सरसराम जरांगे, आसाराम जरांगे, रामप्रसाद जरांगे, प्रकाश जरांगे, ज्ञानेश्वर जरांगे, तात्याराम जरांगे, गीतांजली जरांगे, मीना जरांगे, रुक्मिणी जरांगे यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.











