राज्यात विधानपरिषदेची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठीची ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सद्यस्थितीत स्थगित करण्यात आली असून, येत्या २५ मे रोजी बिहारसाठी सुटणारी विशेष रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे.
राज्यातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांची मोफत सफर घडवून आणण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागपूरहून २५ मे रोजी बिहारमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांसाठी एक विशेष रेल्वेगाडी रवाना होणार होती. मात्र, १८ मे पासून राज्यात विधानपरिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या सरकारी योजनांवर किंवा नव्या उपक्रमांवर निर्बंध येत असल्याने, प्रशासनाला या यात्रेला तूर्तास ‘ब्रेक’ लावावा लागला आहे.
या पहिल्या टप्प्यातील विशेष तीर्थदर्शन यात्रेदरम्यान ज्येष्ठ नागरिकांना बिहार राज्यातील जागतिक वारसा स्थळांची सफर घडवली जाणार होती. यात प्रामुख्याने भगवान गौतम बुद्ध यांची ज्ञानभूमी आणि साधना भूमी असलेले गया येथील ‘महाबोधी मंदिर’, ऐतिहासिक ‘राजगीर’ आणि प्राचीन शिक्षणाचे केंद्र असलेले ‘नालंदा’ या अत्यंत पवित्र आणि प्रेक्षणीय स्थळांचा समावेश होता. या यात्रेसाठी नागपूर व परिसरातील अनेक वृद्ध भाविकांनी मोठ्या उत्साहात नावनोंदणी केली होती. मात्र, ऐन प्रवासाच्या तोंडावर ही स्थगिती आल्याने ज्येष्ठ नागरिकांचा हिरमोड झाला आहे.
या अचानक झालेल्या बदलामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले की, आचारसंहितेच्या नियमांमुळे २५ मे रोजी सुटणारी विशेष रेल्वे सद्यस्थितीत पुढे ढकलण्यात येत आहे. ही यात्रा रद्द झालेली नसून केवळ तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या यात्रेची पुढील तारीख आणि सुधारित वेळापत्रक आचारसंहितेची मुदत संपल्यानंतर स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल. त्यामुळे सर्व निवडक लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला राज्यातील वृद्धांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरची परिस्थिती बेताची असलेल्या अनेक ज्येष्ठांना या योजनेमुळे मोफत देवदर्शनाची सुवर्णसंधी मिळाली आहे. प्रवासाची सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच केवळ तांत्रिक आणि कायदेशीर कारणास्तव ही गाडी थांबवावी लागली आहे. आता आचारसंहितेचा कार्यकाळ कधी संपतो आणि समाज कल्याण विभाग यात्रेची पुढील तारीख कधी जाहीर करतो, याकडे तीर्थयात्रेसाठी उत्सुक असलेल्या शेकडो ज्येष्ठ नागरिकांचे डोळे लागले आहेत.











