मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वातावरण तापलं असून, मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी ३० मेपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
त्याआधी सरकारकडून चर्चा व्हावी, यासाठी त्यांनी प्रसाद लाड यांना अंतरवालीत येण्याचं आवाहन केलं होतं. जरांगेंची ही विनंती मान्य करत प्रसाद लाड आज त्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
मात्र, त्याआधी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये थांबले असताना दोन जणांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला.
धक्कादायक बाब म्हणजे, याअगोदर प्रसाद लाड यांच्या पीएला धमकीचा फोन आला होता. योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांनी धमकी दिल्याचा आरोप असून, पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाबाबत प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “दोन जण ताब्यात आहेत आणि एक जण फरार आहे. हे दोघे हॉटेलच्या परिसरात आले होते. पोलिसांनी विचारणा केली असता ते निवेदन द्यायला आल्याचं सांगत होते. मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतलं.”
दरम्यान, प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगेंनी प्रसाद लाड यांच्या शब्दावर विश्वास ठेवत गावागावातील बैठका स्थगित केल्या आहेत. 23 मेपर्यंत सरकारकडून सकारात्मक चर्चा न झाल्यास 30 मेपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
“प्रसाद लाड यांच्यात समाजाविषयी तळमळ दिसते. आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आंदोलनाची गरजच उरणार नाही. आम्ही अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत आहोत.”
धमकीनंतर प्रसाद लाड यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कडक बंदोबस्तात प्रसाद लाड अंतरवाली सराटीकडे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. आमच्या दोघांमध्ये जे काही बोलणे होईल, ती सर्व चर्चा मी सरकारपर्यंत पोहोचवेन आणि त्यानंतर नक्कीच या प्रकरणावर काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास भाजप नेते प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.











