मोशी टोलनाका परिसरात बुधवारी (दि. १३ मे) रात्री झालेल्या धक्कादायक घटनेत आरपीआय कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. युवराज गार्डन हॉटेलमध्ये साडेनऊच्या सुमारास हा थरार घडला.
या प्रकरणी जुन्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, नितीन धोत्रे याचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले आहे.
अनिल मारुती गोळे उर्फ मोरे (वय ४६, रा. कुरुळी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ते रिअल इस्टेट व्यवसायासह आरपीआय पक्षात सक्रिय होते आणि महाराष्ट्र राज्य आरपीआय कामगार आघाडीचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांचे वाहनचालक नागनाथ कुंडलिक चाटे (४३, रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे), मूळ रा. आनंदवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. १४ मे) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल गोळे हे बुधवारी स्वतः कार चालवत बाहेर पडले होते. दरम्यान, रात्री वैभव रोकडे यांनी चालक चाटे यांना फोन करून युवराज गार्डन हॉटेलमध्ये गंभीर प्रकार झाल्याची माहिती दिली. चाटे घटनास्थळी पोहोचले असता, गोळे हे कॅश काऊंटरसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. जखमी गोळे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांनी त्यांच्यावरील हल्ल्याबाबत चाटे यांना सांगितले. ”काही दिवसांपूर्वी नितीन धोत्रे याच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. त्यावेळी धोत्रे याने धमकी दिली होती. तसेच, धोत्रेच्या सांगण्यावरून दोन अज्ञातांनी माझ्यावर चाकूने हल्ला केला,” असे गोळे यांनी चालक चाटे यांना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमी गोळे यांना तातडीने मोशीतील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी (दि. १४ मे) पहाटे तीनच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या हत्येमागे जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईचा राग कारणीभूत असल्याची चर्चा आहे. धोत्रे याचा पुणे ग्रामीण हद्दीत जुगार क्लब सुरू असल्याची माहिती असून, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली होती. ही कारवाई गोळे यांच्या सूचनेवरून झाल्याचा संशय असल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या हल्ल्यात अनिल गोळे यांच्या पोटात चाकू खुपसण्यात आला असून, नाक आणि डाव्या गुडघ्यावरही वार करण्यात आले. घटनेनंतर आरपीआय कार्यकर्ते संतप्त झाले असून, संशयितांना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.











