अंमलीपदार्थांच्या वाढत्या विळख्याला लगाम घालण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने धडक कारवाई सुरू केली आहे. अवघ्या २४ दिवसांत अमली पदार्थ तस्करीच्या सुमारे ५२ घटना उघडकीस आणत गुन्हे दाखल केले आहेत.
यात १.९० कोटींचे अमली पदार्थ जप्त केले असून यात ५१ आरोपींना अटक केली आहे.
मागील वर्षभरापासून वसई विरार व मिराभाईंदर शहरात अमली पदार्थांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.यात मेफेड्रोन, गांजा, हेरॉईन, कोकेन अशा विविध प्रकारच्या अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकार समोर येत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांलयातील तिन्ही परिमंडळ, अमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे प्रकटीकरण शाखा यांच्या मार्फत २० एप्रिल पासून अमली पदार्थ तस्करांची शोध मोहीम सुरू केली होती.
या कारवाईत पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून कोकेन, गांजा, मेफेड्रोन, ब्राऊन शुगर असे विविध १ कोटी ९० लाख २ हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यात ५२ गुन्हे दाखल करीत ५१ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक,अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ १ पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण, पोलीस उपायुक्त ( गुन्हे ) संदीप डोईफोडे, परिमंडळ २ पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले- श्रींगी, परिमंडळ ३ पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सर्व ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने पार पाडली आहे.
शहरात सार्वजनिक ठिकाणी, आडोशाला, रस्त्या लगत अशा ठिकाणी काही जण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे प्रकार समोर येत असतात त्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहेत. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या ४२२ व्यक्तींवर कारवाई करीत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.










