राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे.
काही ठिकाणी उष्माघातामुळं मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घडली आहे. एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात उष्माघाताने महिलेचा बळी गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. शेतात कांदे काढणीच्या कामासाठी मजूर म्हणून आलेल्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नकुशा बाळू सुपे, वय 33 वर्षे, या मूळच्या खेड तालुक्यातील वाडा-सुपेवाडी येथील रहिवासी होत्या. त्या सध्या कांदा काढणीच्या कामानिमित्त आमोंडी येथे आल्या होत्या. कांदा काढणी करत असताना दुपारच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या. यानंतर सोबतच्या कामगारांनी त्यांना तातडीने शिनोली येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सदर महिलेला घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे सुपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत उन्हात काम करणाऱ्यांनी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.











