May 14, 2026 2:22 pm

वेण्णानदीच्या पात्रात शेकडो टन मातीचा ढिगारा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महाबळेश्वरची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या वेण्णा नदीचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे.वेण्णा लेकला वळसा घालून जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील नवीन पुलाच्या कामासाठी केलेले उत्खनन आणि त्यानंतर नदीपात्रातच टाकलेली शेकडो टन मातीमुळे नदीचा श्वास गुदमरला आहे. पावसाळा उंबरठ्यावर असतानाही माती उचलण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे वेण्णा नदीचे उगम पात्रच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली असून, परिसरातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.

वेण्णा धरणाच्या बंधाऱ्याजवळ बायपास रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी काढलेली माती पावसाळ्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल, असे आश्वासन संबंधित विभागाकडून देण्यात आले होते. मात्र, पावसाळा सुरू होण्यास केवळ एक महिना शिल्लक असतानाही अद्याप माती उपसण्याच्या कामाला साधी सुरुवातही झालेली नाही. माती नदीपात्रातच पडून राहिल्याने पावसाच्या पहिल्याच सरींसोबत ती वाहत जाऊन नदीचे पात्र बुजण्याची दाट शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने नदीच्या उगमस्थानावर ‘पूर नियंत्रण रेषा’ निश्चित करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी हे काम रोखून धरले आहे. नदीचे पात्रच शिल्लक राहिले नाही, तर पूररेषा कोठून आखणार? असा सवाल शेतकरी करीत आहेत. नदीपात्रातील माती काढून नदीचे संरक्षण करा आणि मगच तांत्रिक कामांकडे वळा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदीपात्रातील शेकडो टन माती आधुनिक यंत्रसामग्री वापरून उचलण्यात यावी. पुलाच्या कामामुळे अडथळा ठरलेले मातीचे ढिगारे हटवून नदीचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावा. प्रशासनाने पुढील आठवड्यात कार्यवाही न केल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वेण्णा लेक ते लिंगमळा या दरम्यानच्या सुमारे तीन किलोमीटर परिसरातील शेती पूर्णपणे वेण्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. नदीपात्र मातीने भरले, तर नदीचे पाणी नैसर्गिक प्रवाहातून न जाता आजूबाजूच्या शेतात शिरणार आहे. यामुळे केवळ पिकांचेच नुकसान होणार नाही, तर शेतजमीनही नापीक होण्याचा धोका आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!