”हिंजवडीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीतील विश्रांती कक्षाच्या वापराबाबत तक्रारींची चौकशी करावी. आवश्यक प्रतिबंधक व तथ्य पडताळणी उपाययोजना कराव्यात,” अशा सूचना देत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलिसांना पत्र दिले आहे.तर, असा कोणताही प्रकार चौकशीत आढळला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांना दिलेल्या पत्रात मिसाळ यांनी म्हटले आहे की, ”एका नामांकित कंपनीतील कार्यालयात पुरुष विश्रांती कक्ष वापराबाबत काही तक्रारी आल्या आहेत. काही विशिष्ट गटाकडून धार्मिक विधींसाठी या कक्षाचा नियमित वापर केला जात असून त्या वेळेत इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश मर्यादित केला जात असल्याची बाबही निदर्शनास येत आहे.
यामुळे तेथील उपलब्ध सुविधांचा एकसमान वापर, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि संस्थात्मक शिस्त यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या माहितीची सत्यता तपासणे आवश्यक आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांशी स्वेच्छेने व गोपनीयतेने संवाद साधणे, त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव, छळ किंवा असुविधा भासत आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे.”
”या पत्रानंतर हिंजवडी पोलिसांनी संबंधित कंपनीत जाऊन तपासणी केली. कर्मचारी व कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. काहीही गैरप्रकार आढळला नाही. मात्र, असा प्रकार असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी केले आहे.
हिंजवडी परिसरातील एका कंपनीबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले आहे. मात्र, हिंजवडी परिसराचा समावेश पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कक्षेत येतो. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांच्या हद्दीबाबत राज्यमंत्रीच अनभिज्ञ असल्याचे या पत्रातून दिसून आले.











