पुण्यातील भोरमध्ये एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी भोरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.”चार वर्षाच्या मुलीला अत्याचार करून ठेचून मारला जातं यावर गृहमंत्र्यांचा राजीनामा अजिबात आपण मागू नये कारण सर्वसामान्य माणूस जगला की मेला याच्याशी त्यांना काय देणं घेणं” असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथं एका ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली.
“पुण्यातील भोर तालुक्यामध्ये एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचून खून करण्यात आला, अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार घडला, त्याचा निषेध करण्यासाठी शब्द नाही. माणूस पण आपल्यााकडे खरं आहे की नाही असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. खरंच राज्याच्या गृहमंत्र्यांकडून अपेक्षा ठेवायची का. जिथे सगळे जण आपला ढोल वाजवण्यामध्ये व्यस्त आहे. मी तिथे किती मोठा आहे हे दाखवण्यात सगळे व्यस्त आहे” अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.
“एक ४ वर्षांचा बाळ सुरक्षित नाही. ४ वर्षांच्या लेकराला सोडलं नाही, त्यामुळे गृहमंत्र्यांना अजिबात राजीनामा मागू नका, त्यांना काही फरक पडत नाही. कारण ते काही राजीनामा देणार नाही. मृतकांच्या घरी जाणे, त्याला मदत पुरवणे, मुळाशी जाऊ असं सांगणं इतकं ते काम करू शकतात. यावर गृहमंत्र्यांचा राजीनामा अजिबात आपण मागू नये कारण सर्वसामान्य माणूस जगला की मेला याच्याशी त्यांना काय देणं घेणं ते तर मी कसा सुपरमॅन मी कसा इन्फ्रा मॅन मी कसा शक्तिशाली मी कसा चाणक्य हेच सांगण्यात मुश्किल आहेत. आपण फक्त एवढेच लक्षात ठेवूया की आपण एका अत्यंत असुरक्षित राज्यांमध्ये राहत आहोत’ अशी टीकाही अंधारेंनी केली.
दरम्यान, नसरापूर, ता. भोर इथं एका नराधमाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून केला. ही घटना अतिशय संतापजनक, मन सुन्न करणारी आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण गृहखात्याला आदेश देऊन या गुन्ह्याचा जलद तपास करण्याच्या सूचना कराव्या. तसंच हा खटला फास्टट्रॅकवर चालवून गुन्हेगाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी रााष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.











