नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरील विमानांचे उड्डाण मोबाईलमध्ये कैद करण्याचा वाढता ट्रेंड आता धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. जेएनपीए (टी पॉईंट) ते कळंबोली सर्कल या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर वाहन थांबवून विमानाचे दृश्य टिपणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले असून, अशा प्रकारांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरील विमानांचे उड्डाण मोबाईलमध्ये कैद करण्याचा वाढता ट्रेंड आता धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. जेएनपीए (टी पॉईंट) ते कळंबोली सर्कल या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर वाहन थांबवून विमानाचे दृश्य टिपणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले असून, अशा प्रकारांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या दिवसाला दिडशेहून अधिक विमानांची येजा सुरू असते. गेल्या चार महिन्यात दिवसाला सूमारे २१ हजारांहून अधिक प्रवाशांनी देशांतर्गत प्रवासाचा अनुभव या विमानतळातून घेतला आहे. सध्या विमानतळावरील धावपट्टीवरील उड्डाण हा पनवेलमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
याच विमानतळाची धावपट्टीचे थेट दर्शन जेएनपीए (टी पॉईंट) ते कळंबोली सर्कल राष्ट्रीय महामार्ग ३४८ वरून स्पष्टपणे दिसत असल्याने विशेषतः शनिवार-रविवारच्या सायंकाळी अनेक नागरिक कुटुंबासह येथे गर्दी करत आहेत. विमान धावपट्टीवरून झेप घेतानाचा क्षण मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी वाहनचालक रस्त्याच्या कडेला थांबत असल्याचे दिसून येते. मात्र, याच परिसरात यापूर्वी तीन वेगवेगळ्या अपघातांत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले की, नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेचा विचार करून अशा प्रकारांना टाळावे. पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या परिसरात वेगवेगळे तीन गंभीर अपघात झाल्याचा दाखला सुद्धा पोलीस येथे जमलेल्या नागरिकांना देत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) पत्र देऊन धावपट्टी दिसणारा भाग काही उंचीपर्यंत झाकण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने तात्पुरत्या उपाययोजनेत सायंकाळच्या वेळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
तरीही सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी जेएनपीए टी-पॉइंट ते कळंबोली सर्कलदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असून नागरिक विमानाच्या उड्डाणाचा अनुभव घेण्यासाठी रस्त्यावर थांबत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की, आकर्षणापोटी जीव धोक्यात घालू नये आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत.











