लातूर, २४ एप्रिल ः”वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘एकम् सत विप्र बहुदा वदन्ति’ हा भारतीय संस्कृतीचा संदेश संपूर्ण जगाला विनाशाच्या छायेतून वाचवू शकतो. हाच संदेश देणार्या अद्वितीय विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनातून जगभर शांतता प्रस्थापित करण्यासाठी संत श्री गोपाळ बुवा महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवशक्ती अनुष्ठान महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे.” असा संदेश विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी दिला.
विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे व समस्त गावकरी मंडळ रामेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विश्वधर्मी मानवतातीर्थ भवनाची वास्तुशांती होम हवन आणि आध्यात्मिक ऊनुष्ठानाच्या माध्यमातून करण्यात आली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शुभार्शीवादाने व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात या सप्ताहाचे व यज्ञाचे आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी तुळशीराम दा. कराड, कमल राजेखां पटेल, दशरथ महाराज कराड, शरद रामकृष्ण पाटील, रामेश्वरचे सरपंच सचिन मोतीराम कराड आणि राजेश का. कराड उपस्थिती होते.
शिवशक्ती अनुष्ठान महायज्ञ राजेश का. कराड यांनी सपत्नीक केला. यावेळी कलश यात्रा आणि शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात गोपाळबुवा मंदिरातून झाली. येथे देवीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. आणि विविध देवतांचे विधीपूर्वक आवाहन करण्यात आले. यानंतर कलश पूजन झाले. येथे रविवार पर्यंत धार्मिक कार्यक्रम आणि विधी आयोजित केले आहेत.
विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांनी आपल्या संदेशात सांगितले की,”आज संपूर्ण जग भीती आणि अनिश्चिततेच्या छायेखाली जगत आहे. एकीकडे जागतिक युद्धाचे गंभीर संकट घोंगावत आहे तर दुसरीकडे भीषण हिंसाचार, रक्तपात, दहशतवाद, समाजाच्या प्रत्येक स्तरावरील हत्या आणि राष्ट्रीय सीमांवरुन सुरू असलेल्या वादांनी संपूर्ण जगाला संशय आणि अविश्वासाच्या अंधारात लोटले आहे. या अस्थिरतेवर एकमेव उपाय म्हणजे परस्पर सामंजस्य आणि वैश्विक बंधुत्वाची भावना वाढवण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे.
” महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील रामेश्वर रुई हे गाव यज्ञभूमी म्हणून ओळखले जाते. येथे हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी मिळून विश्वधर्मी श्री राम रहीम मानवता सेतू, भगवान श्रीराम मंदिर, तथागत गौतम बुद्ध विहार, नूतनीकरण केलेली जामा मशीद आणि हजरत जैनुद्दीन चिश्ती दर्गा सारख्या अनेक उल्लेखनीय वास्तू उभारल्या आहेत. अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रयत्नांमुळे रामेश्वर रुई हे मानवता तीर्थ म्हणून उदयास आले आहे.”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांनी संदेशात सांगितले की,”रामेश्वरचे रुई नाव संपूर्ण जगभरात मानवतेचा व विश्वशांतीचा संदेश देणारे गाव म्हणून ओळखले जात आहे. २१ व्या शतकात भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगाला सुख, समाधान व शांतीचा मार्ग दाखखेल. तसेच ज्ञानाचे दालन म्हणून उद्यास येईल. ”
या वेळी रामेश्वरच्या पंचक्रोशितील भाविक भक्त आणि माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.











