एका २६ वर्षीय तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला तिचा साखरपुडा झाला होता. पण त्यानंतर तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं लग्न मोडण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली.
त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होती. तिचं शव बुधवारी तिच्या राहत्या घरी सापडलं. ही हृदयद्रावक घटना आंध्र प्रदेशच्या कडप्पा जिल्ह्यात घडली.
कडप्पा जिल्ह्यातील पटेल रोड परिसरात वास्तव्यास असणाऱ्या रेहानाचं शव तिच्या राहत्या घरी आढळून आलं. रेहानानं नुकतीच एमएस्सीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. तिचा साखरपुडा १५ फेब्रुवारीला शाहजहाशी झाला होता. तो बंगळुरुत काम करतो. शाहजहा पेशानं इंजिनीअर असून तो मूळचा कडप्पा जिल्ह्यातील प्रोड्डाटूरचा रहिवासी आहे.
रेहाना आणि शाहजहा यांचा विवाह ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये होणार होता. सुरुवातीला दोघांचे संबंध अतिशय उत्तम होते. दोघे रात्री उशिरापर्यंत फोनवर गप्पा मारायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन आठवड्यांपूर्वी शाहजानचं वागणं अचानक बदललं. याचा उल्लेख रेहाननं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या १२ पानी पत्रात केला आहे.
‘मला तू आवडत नाहीस असं शाहजहा म्हणाला होता. माझ्या मनात तुझ्यासाठी कोणत्याही भावना नाहीत, असंही तो म्हणाला होता. त्याचं वागणं भावनाशून्य होतं. चार तरुणींशी त्याचे प्रेमसंबंध होते. ही माहिती खुद्द शाहजहानंच मला दिली होती. तू आयुष्यात येण्याआधी माझ्या जीवनात माझ्या चार गर्लफ्रेंड होत्या, असं शाहजहानं सांगितलं होतं,’ असा उल्लेख रेहाननं जीव देण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात केला आहे.
रेहानाच्या कुटुंबानं शाहजहावर गंभीर आरोप केले आहेत. ‘शाहजहानं नातं संपुष्टात आणण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. मला दारुचं व्यसन आहे. माझ्या बऱ्याच गर्लफ्रेंड आहेत. वडिलांनी मला जबरदस्तीनं लग्नासाठी भाग पाडलं. त्यामुळे मी साखरपुडा केला. पण आता मला हे नातं नको. तू लग्न मोडून टाक, असं शाहजहा रेहानाला सांगत होता. या सगळ्यामुळे रेहाना तणावात होती. त्यामुळेच तिनं टोकाचं पाऊल उचललं,’ असे आरोप रेहानाच्या कुटुंबानं केलं. या प्रकरणी पोलिसांनी शाहजहा आणि आई, वडिलांना अटक केली आहे.










