रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात मोठ्या गाजावाजा करत उभारण्यात येत असलेल्या रस्त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. ‘दोन हजार वर्षे टिकणारा रस्ता’ अशी मोठी जाहिरातबाजी करण्यात आल्यानंतरही, हा रस्ता काम पूर्ण होण्याआधीच खचल्याने या प्रकल्पावर आणि संबंधित यंत्रणेवर नागरिकांकडून तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सुरवातीला अत्यंत टिकाऊ म्हणून भासवलेला हा रस्ता आता ‘टाकाऊ’ ठरल्याची चर्चा शहरात सर्वत्र रंगली आहे.
मारुती मंदिर सर्कल येथे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून छोटे दगड (पेव्हिंग) बसवून रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पावसाळ्यात या भागात दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या कायमस्वरूपी मिटावी आणि शहराच्या सौंदर्यात भर पडावी, या उद्देशाने हे काम करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, एका मार्गिकेचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होताच, रस्ता खचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
सध्या रस्ता खचल्यामुळे या ठिकाणी घसरगुंडीची परिस्थिती निर्माण झाली असून, वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य आणि कामाच्या दर्जाबाबत आता स्थानिकांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.










