संपूर्ण महाराष्ट्रात उकाडा वाढला असून अहिल्यानगरमघ्ये दुसरा उष्माघाताचा बळी गेल्याची घटना समोर आलीये. पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील ५० वर्षीय शिक्षिका उषा पोपट फापाळे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
दरम्यान यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.शिक्षिका उषा फापाळे या नेहमीप्रमाणे गारगुंडीहून त्यांच्या दुचाकीवरून शाळेत गेल्या होत्या. शाळा दुपारी १२ वाजता सुटल्यानंतर त्या घरी परतत होत्या. त्यावेळी शहरात उन्हाचा तडाखा खूप वाढलेला होता. घरी पोहोचल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्याचप्रमाणे अशक्तपणा, चक्कर येणं अशी लक्षणंही दिसू लागली.
त्यांची परिस्थिती पाहता त्यांना कान्हूर पठारच्या खाजगी रूग्णालयात दाखल केलं. प्राथमित तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्यांना पुढच्या उपचारांसाठी अहिल्यानगरमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांची प्रकृती खालावत होती. त्यामुळे उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. ऋत्विज म्हसके खिलारी यांनी दिली.
शेतात काम करताना झाला होता महिलेचा मृत्यू
अहिल्यानगरच्या पारनेर तुक्यातील ढवळपुरीत गेल्या आठवड्यात उष्माघाताने एक बळी गेला होता. ४५ वर्षीय हर्षदा रावसाहेब चौधरी असं या महिलेचं नाव होतं. दुपारच्या कडत उन्हात हर्षदा मका कापत होत्या आणि त्यावेळी त्यांना चक्कर आली होती. त्यावेळी त्यांना उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.










