भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून तात्काळ तिकिट बुकिंगची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी नियमांत मोठे बदल केले आहेत. या नव्या नियमांमुळे तिकिट बुकिंग अधिक सोपं होणार असून सर्वसामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकिट मिळण्याची शक्यता वाढणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून तत्काळ तिकिट बुकिंग सुरू होताच काही सेकंदांतच सर्व तिकिटे संपत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. एजंट्स आणि बनावट अकाउंट्समुळे ही प्रक्रिया अधिक अडचणीची बनली होती, मात्र IRCTCच्या नव्या नियमांमुळे या समस्यांवर आळा बसणार आहे.
काय आहेत बदल?
नव्या नियमानुसार आता तत्काळ तिकिट बुकिंग ट्रेन सुटण्याच्या एका दिवस आधी सकाळी 10 वाजताच सुरू होणार आहे. तिकिट बुकिंग केवळ IRCTCच्या अधिकृत खात्यामधूनच करता येणार असून त्या खात्याशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे बनावट नावांनी तिकिट बुक करणं शक्य होणार नाही. तसेच एका खात्यावरून एका दिवसात केवळ दोनच तिकिटे बुक करता येणार असल्याने तिकिटांची साठेबाजी आणि महाग दरात पुनर्विक्री थांबवण्यास मदत होणार आहे.
एजंट्सवरती निर्बंध
तत्काळ विंडो सुरू होताच एजंट्सकडून झपाट्याने तिकिटे बुक केली जात असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक फिल्टर आणि ट्रॅकिंग प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संशयास्पद अकाउंट्सवर लक्ष ठेवण्यात येणार असून गरज भासल्यास त्यांच्यावर निर्बंध घातले जाणार आहेत. याशिवाय, तिकिट बुकिंगच्या शेवटच्या टप्प्यात पेमेण्ट फेल होण्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी पेमेण्ट प्रणाली अधिक जलद आणि सुरक्षित करण्यात आली आहे.
कोणाला मिळणार रिफंड?
या नव्या नियमांसोबतच तात्काळ तिकिटांच्या रिफंड प्रक्रियेतही बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत तत्काळ तिकिटांवर रिफंड मिळत नव्हता, मात्र आता ट्रेन रद्द झाल्यास किंवा चार तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास प्रवाशांना पूर्ण रिफंड मिळणार आहे. हे सर्व नवे नियम 2026 पासून लागू होणार असून, त्यामुळे तात्काळ तिकिट बुकिंग प्रक्रिया अधिक न्याय्य आणि प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे.











