पुणे:- राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे त्यांच्या मिश्किल व हजरजबाबी स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या पत्रकार परिषदा किंवा जाहीर सभांमध्ये त्यांनी केलेल्या अशाच कोट्या अनेकदा चर्चेचा विषयदेखील ठरतात. सध्या महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यानिमित्ताने अजित पवार प्रचारासाठी फिरत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी रविवारी केलेल्या जाहीर भाषणात केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. यावेळी अजित पवारांनी “काकांच्या पुण्याईनं माझं व्यवस्थित चालू आहे”, या आपल्या विधानाचादेखील व्यासपीठावरून पुनरुच्चार केला.
अजित पवार कार्यकर्त्याला नेमकं काय म्हणाले?
पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं युती केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर अनेक ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या पक्षांच्या युती वा आघाड्यांप्रमाणेच या युतीवरदेखील अनेकांनी भुवया उंचावल्या. त्याच पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी घड्याळ व तुतारीचं नाव घेऊन आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी गेल्या काही काळात पिंपरी-चिंचवडमध्ये आधीच्या सत्ताधाऱ्यांनी कसा गैरप्रकार चालवला आहे, यावर भाष्य केलं.
“लोकांचे बंगले पाडणं, गाई-गोठे पाडणं, ब्लू लाईनमध्ये येतायत म्हणून जमीनदोस्त करणं असे त्रास देण्याचं काम चालू आहे. ही बांधकामं होऊनच दिली नसती तर कशाला त्या बिचाऱ्याचा पैसा वाया गेला असता?होताना कळत नव्हतं का की ते ब्लू लाईनमध्ये येतंय? तेव्हाच थांबवायचं, का त्यांचं नुकसान केलं?” असा सवाल अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केला. यावेळी समोरच्या श्रोत्यांमध्ये बसलेल्या एका कार्यकर्त्याने मोठ्यानं ओरडून “अजितदादा वी लव्ह यू” म्हणताच इतर उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. यावर अजित पवारांनी संबंधित कार्यकर्त्याला मिश्किल शब्दांमध्ये दम दिला!
अजितदादा म्हणतात, “ते लव्ह यू राहू दे बाजूला…”
कार्यकर्त्याकडे बघून अजित पवार म्हणाले, “हां, घड्याळाचं बटण दाब. ते लव्ह यू राहू दे बाजूला.. घरी जाऊन बायकोला म्हण लव्ह यू लव्ह यू लव्ह यू.. बायको म्हणेल आज लैच बिघडलाय गडी” आणि उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला !
माझी कर्मभूमी पिंपरी-चिंचवड अजित पवार
यावेळी अजित पवारांनी आपली जन्मभूमी बारामती असून कर्मभूमी पिंपरी-चिंचवड असल्याचा उल्लेख केला. “आता काहीजण म्हणायला लागले की आता इथे काही झालं तर काय बारामतीला फोन करायचा का? अहो २५ वर्षांत इथला विकास होताना बारामतीला जावं लागलं नाही. बारामतीचाच माणूस इथे यायचा आणि विकास करायचा. उगीच लोकांना खोटंनाटं सांगू नका. माझ्यात तेवढी ताकद आहे. मी दर आठवड्याला पुण्याला येणारा कार्यकर्ता आहे”, असं ते म्हणाले.











