मुंबई:- दैनंदिन जीवनात आपण अनेकदा ऐकतो की, ‘श्रीमंती एका रात्रीत येत नाही’. पण जेव्हा हीच श्रीमंती तपास यंत्रणांच्या रडारवर येते, तेव्हा मात्र एका रात्रीत सर्व काही बदलून जाते. एखाद्या सामान्य शहरात जेव्हा अचानक 36 गाड्यांचा ताफा आणि दीडशे सशस्त्र जवान धडकतात, तेव्हा ती केवळ बातमी राहत नाही, तर तो एक मोठा भूकंप ठरतो. सध्या असेच काहीसे चित्र भारत-नेपाळ सीमेवरील बिहारच्या रक्सौल शहरात पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शांत वाटणाऱ्या रक्सौलमध्ये शुक्रवारी पहाटे 6 वाजता अचानक हालचाली वाढल्या. प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्या संयुक्त पथकाने रक्सौलचे प्रसिद्ध व्यावसायिक मोहम्मद कलीम यांच्या ठिकाणांवर धाड टाकली. विशेष म्हणजे, ही कारवाई केवळ एक-दोन तासांची नव्हती; तर गेल्या 30 तासांहून अधिक काळ ही तपासणी सुरू आहे.
मोहम्मद कलीम हे रक्सौलमधील एक बडे प्रस्थ मानले जातात. हिरो एजन्सी आणि तनिष्क शोरूमचे मालक असलेल्या कलीम यांच्यावर आयकर विभाग गेल्या सहा महिन्यांपासून पाळत ठेवून होता. गुप्त माहितीच्या आधारे, एका महिला डायरेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही हाय-प्रोफाइल रेड आखण्यात आली. आता या तपासाचा परीघ वाढला आहे, कलीम यांच्या नातेवाईकांसह त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटच्या (CA) आश्रम रोडवरील निवासस्थानीही कसून चौकशी सुरू आहे.
तपास अद्याप अधिकृतपणे संपलेला नसला तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत
अख्खी तिजोरी उघडली तेव्हा आत मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेमध्ये 2000 रुपयांच्या जुन्या नोटांचाही समावेश असल्याचे समजते, ज्यामुळे तपास यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत. मालमत्तेशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आणि बेनामी व्यवहारांचा संशय व्यक्त केला जात आहे.











