मुंबई: येत्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी होणारे मतदान राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरणार आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण देशाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.
शिवसेना उबाठा आणि मनसेच्या या ऐतिहासिक युतीमुळे सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही नेत्यांची एक विशेष मुलाखत पार पडली, ज्यामध्ये त्यांनी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) घणाघाती टीका केली.
‘आऊट ऑफ सिलॅबस’ पेपर
राज ठाकरे यांनी या मुलाखतीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना एक अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांसाठी सर्व योजना आखल्या होत्या, मात्र ठाकरे बंधूंची युती होईल याची त्यांनी कधी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती, असे राज ठाकरे म्हणाले. विरोधकांनी आखलेल्या रणनीतीमध्ये ही युती म्हणजे त्यांच्यासाठी आऊट ऑफ सिलॅबस पेपर आल्यासारखे असल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या 7 वर्षांपासून निवडणुका तुंबल्या होत्या आणि जर वेळेत निवडणुका झाल्या असत्या, तर आज जे चित्र दिसते आहे ते कदाचित वेगळे असते, असेही त्यांनी सांगितले .
‘मराठी माणसांत फूट पाडणे हेच मिंधेंना काम’ उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करताना त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या केवळ नुरा कुस्ती सुरू असून, विरोधकांसाठी कोणतीही जागा ठेवायची नाही असा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी माणसाची मते फोडण्यासाठीच मिंधेंना वापरले जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले. सोयीच्या हिंदुत्वाला कोणताही अर्थ नसतो, असे सांगत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या कार्याची आठवण करून दिली. हिंदुस्थानात केवळ हिंदुत्वाच्या जोरावर निवडणूक लढवून ती जिंकता येते, हे सिद्ध करणारे एकमेव नेते बाळासाहेब ठाकरे होते. ज्या काळात बाळासाहेबांनी हे करून दाखवले, त्या काळात भाजप गांधीवादी समाजवादात अडकला होता, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. सध्या केवळ निवडणुका जिंकण्यासाठी हिंदुत्वाचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, ठाकरे बंधू एकत्र येण्याचे मुख्य कारण मराठी माणसाचे न्याय आणि हक्क हेच आहे. आम्ही एकत्र आलो म्हणजे इतर भाषिकांवर अन्याय करण्यासाठी आलो आहोत, असा त्याचा अर्थ होत नाही. मात्र, महाराष्ट्र कोणासमोरही लाचार होत नाही, हे संपूर्ण देशाला दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. राज्याच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.











