मुंबई:- ऑगस्ट महिन्यात दादर येथील कबुतरखान्याविरोधात रान पेटलं होतं. उच्च न्यायालायने आरोग्याच्या कारणात्सव हा कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, उच्च न्यायालायच्या या आदेशाला जैन समाजाने कडाडून विरोध केला. त्यामुळे मुंबईकरांनी कबुतरांसाठीचा एक वेगळाच संघर्ष पाहिला. या मुद्द्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रोखठोक भूमिका घेत कबुतरखाना बंद करण्याचे आवाहन केले होते. याच मुद्द्यावरून आता राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकलं आहे.
“कबुतराचा वाद आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आणला असल्याचं जैन मुनी निलेश चंद्रा म्हणाले. म्हणजे राजकारणासाठी मुद्दामहून आंदोलन करायला लावलं. समाजासमाजात फुट पाडायची. यातून तुम्हाला राजकारण करायचं आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.
गुजरातला जाऊन कबुतरे उडवा
“मुंबईत गुजराती-मारवाडी १३ टक्के आहेत. त्यांना पैशांचा माज असेल तर कबुतरे घ्या आणि गुजरातला जाऊन उडवा. कबुतरांमुळे रोगराई पसरते, एवढंही तुम्हाला भान नाही. याचा त्रास होत नाही? कळतंय सर्व, पण राजकारण करायचं आहे”, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.
दरम्यान, निवडणुकीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असताना प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे माध्यमांना मुलाखती देणे, जाहीर सभा घेणे, रॅलींमधून जनतेला भेटणे अशा पद्धतीचे इलेक्शन कॅम्पेन सध्या जोर धरतंय. त्यातच जुन्या मुद्द्यांना हात घालून त्यांना नवी धार देण्याचं कामही या माध्यमातून केलं जातंय. त्यामुळे पुढील दोन तीन दिवसांत अजून किती मुद्द्यांवर बोललं जातंय, किती मुद्दे उखरून काढले जातायत हे पाहावं लागेल.
भाषा हा मुद्दा महाराष्ट्रात रुजायचा आहे. गुजरात, तामिळमध्ये कडवटपणा आहे. मला असं वाटतं की भाषा हे तुमचं अस्तित्व आहे. जमीन आणि भाषा एकदा तुमच्या हातातून गेली की ती परत येत नाही. हा आजपर्यंतचा जगाचा इतिहास आहे. याचं भान महाराष्ट्रातील सर्वांनी ठेवणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.











