पुणे : नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस पुणे आणि खडकी रेल्वे स्थानकांपर्यंत सुरू ठेवण्यासंदर्भात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे. या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीसंदर्भात रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाला कळविले असल्याचे सुळे यांनी समाज माध्यमाद्वारे सांगितले.
पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी आणि विस्तारीकरणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दक्षिणोत्तर धावणाऱ्या गाड्यांच्या थांब्यांसाठी स्थानकांचे विस्तारीकरण सुरू केले आहे. त्याचा भाग म्हणून २६ जानेवारीपासून हरंगुळ आणि नांदेड एक्स्प्रेसला पुणे स्थानकाऐवजी हडपसरला थांबा देण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्याची प्रायोगिक तत्त्वावर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, या गाड्यांच्या स्थानकावरून सुटण्याचा आणि स्थानकावर येण्याचा कालावधी प्रवाशांना पूरक ठरत नसून दैनंदिन प्रवाशांना हडपसर स्थानकापासून पुढचा किंवा तेथपर्यंतचा प्रवास जिकिरीचा ठरणार असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या या गाड्यांच्या नियोजनानुसार, नांदेड स्थानकावरून निघालेली गाडी (१७६३०) हडपसरला पहाटे ४.३५ वाजता पोहोचते. तसेच हरंगुळवरून निघालेली गाडी (०१४८७) हडपसर स्थानकावर रात्री ८.४५ मिनिटांनी येते. त्याचप्रमाणे जाणाऱ्या गाड्यांचे नियोजन आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, धाराशीव, बार्शी मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाच्या गाड्या असून या गाड्यांतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि इतर कामानिमित्त अनेक प्रवासी या गाड्यांचा अवलंब करतात. पुणे स्थानकावरून शहरी भागात सहज ये-जा करता येते.
मात्र, हडपसर स्थानकामुळे पुढील अंतर वाढत असून दैनंदिन प्रवाशांच्या वेळेचे गणित कोलमडते. अपरात्री हडपसर स्थानकावर उतरल्यानंतर पर्यायी सार्वजनिक वाहूतक व्यवस्थेची अनुपलब्धता आणि पुढचा प्रवास जिकिरीचा होताे. तसेच वाहतूक कोडी, गर्दीतून प्रवास, नियोजित ठिकाणी पोहोचण्यास विलंब यांमुळे अडचणी वाढण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या संतप्त मागणीवरून सुळे यांनी समाज माध्यमाद्वारे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली.
रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण
खासदार सुळे यांनी केलेल्या तक्रारवजा मागणीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुलभ प्रवासाचा अनुभव घेता यावा, गर्दी आणि पुणे स्थानकावरील व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच सार्वजनिक वाहतूक सुविधा वाढविण्याबाबत नियोजन करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.











