रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी मध्यरात्री अपघात झाल्याची माहिती समोर आली. पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटात त स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1 हजार फूट खोल दरीत कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू झाला.
आठजणांपैकी ५ जण हे सातारा जिल्ह्यातील आसगाव या गावातील होते. त्यामुळे या गावात मोठी शोककळा पसरली आहे. गावातील एकाच रस्त्यावर या पाच जणांची घरे असल्याने हृदय पिटाळून टाकणारा आक्रोश ऐकू येत आहे. मध्यरात्री घडलेल्या हा अपघात समोर कसा आला, याबाबतची माहिती समोर आली आहे. हा अपघात शनिवारीच झाला होता का, याची शंकाही उपस्थित होऊ लागली आहे.
भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा मृ्त्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे.. अपघातग्रस्त सर्वजण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळतीये. दरम्यान, याठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. इतर तिघांचा शोध सुरू आहे.
या अपघातात रितेश लोखंडे या तरुणाचा मृत्यू झाला. रितेशच्या वडिलांनी अपघाताबाबत एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हृदय पिटाळून सांगणारी माहिती दिली. रितेश लोखंडेच्या वडिलांनी सांगितले की, काल सकाळपासूनच मनात सारखी धाकधूक होत होती, कशातच मन लागत नव्हते. मी दिवसभरात ५०-६० वेळा मुलांना फोन लावला. पलीकडून फोनची रिंग सारखी वाजत होती, पण कोणीच फोन उचलत नव्हते. जसजसा वेळ जात होता, तसतसा माझ्या जीवाला घोर लागू लागला होता.” अपघातात आपल्या पोटच्या गोळ्यांना गमावलेल्या रितेशच्या वडिलांनी आपली व्यथा सांगितली.
संध्याकाळ झाली तरी मुलांशी संपर्क न झाल्याने अखेर त्यांनी आपल्या मोठ्या भावाला आणि भाचीला फोन करून ही बाब कळवली. मुलांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने संपूर्ण कुटुंबाची धावपळ आणि शोधाशोध सुरू झाली. रात्रीचे १ ते २ वाजले तरी फोनवर फोन सुरू होते, मात्र मुलांचा कोणताही सुगावा लागत नव्हता.
“मी स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करतो. रात्रीच्या त्या कठीण प्रसंगात आमच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर थोरात माझ्या मदतीला धावून आले. त्यांनी तात्काळ आपले संपर्क वापरून पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणांशी संपर्क साधला आणि शोधमोहीम सुरू केली.”
पोलीस आणि स्थानिक यंत्रणांनी चक्रं फिरवल्यानंतर अखेर त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघाताची माहिती समोर आल्याचे त्यांनी जड अंत:करणाने सांगितले.
यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाची हलगर्जी भोवली असल्याचा आरोप केला. घाटात संरक्षक कठडे, भिंत नाही. ही संरक्षक भिंत असती तर मुलांचे जीव वाचले असते, असे ग्रामस्थांनी सांगितले. आता तरी प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात असं आर्जव ग्रामस्थांनी पाणावलेल्या डोळ्यांनी केले.
हर्णे येथून पिकनिक आटोपून पुन्हा साताऱ्यात आपल्या घरी जात असताना आंबेनळी घाटात अपघात झाला. घाटातील अपघातामध्ये महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), रितेश राजेंद्र लोखंडे (२५), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), अंश समीर चव्हाण (१८), उत्कर्ष आनंद शिंगटे (२१), अनिल अभिमन्यू शिंगटे (२५), नितीन किसन नायकोंडे (३५) अशी मृतांची नावे आहेत.











