येथील मस्जिद रोडवरील ‘नो एन्ट्री’तून प्रवेश करणाऱ्या दुचाकींमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडत असताना पोलिस मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा अजब प्रकार येथे घडू लागल्यावर चक्क नगरसेवकांनीच रस्त्यावर उतरून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
दररोजच्या सकाळप्रमाणे येथील मस्जिद रोडवरील वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह स्थानिक हैराण झाले होते. अनेक वेळा या वाहतूक कोंडीमुळे परिसरात भांडणे वाद होत असल्याने याबाबत वारंवार पोलिसांना कळवूनही पोलिस कोणतीही कारवाई करत नव्हते.
ही कोंडी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांना त्यांच्या हॉटेलवरून निदर्शनास आली. मस्जिद रोडवरून अनेक दुचाकी वाहने चुकीच्या मार्गाने येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी स्वत: तेथे जाऊन नो एन्ट्रीतून येणाऱ्या वाहनांना मज्जाव करण्यास प्रारंभ केला. त्यांना परत पाठवायला सुरुवात केली. त्यांच्या या पुढाकाराला पाठिंबा देत नीलेश शेटे, संदीप शिंदे, पृथ्वीराज भिसे, सैफ वारुणकर अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील सहकार्य केले. त्यामुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी सुरळीत होऊन रस्ता कोंडीमुक्त झाला.
वास्तविक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नो एन्ट्रीमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांना तिथेच अडवून काही दिवस पोलिसांनी सवय लावली, तर निश्चित हा प्रश्न सुटू शकतो. मात्र, या चौकात केवळ क्रेन व जामर वापरून पर्यटकांची लुबाडणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिस कोंडी सुरळीत करण्यासाठी काम करतात की पर्यटकांची अडवणूक करून लूटमारी व वसुलीचे काम करतात? याबाबत शहरातून उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
या प्रकारानंतर मस्जिद रोडवरील काही लोक पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी गेली असता येथील पोलिसांनी दुचाकींना नो एन्ट्रीमध्ये प्रवेश असल्याचे वक्तव्य केल्याने पोलिस ठाण्यात एकच हशा पिकला व पोलिसांनाच नियम समजावून सांगण्याची वेळ स्थानिकांवर आली. यामुळे शहरात पोलिसांच्या कामाबाबत चर्चा सुरू झाली.
काही मिनिटांत आम्ही रस्त्यावर उभे राहून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात यशस्वी झालो; परंतु हेच काम छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे राहणाऱ्या वाहतूक पोलिसांनी इमानदारीने केल्यास हा प्रश्नच निर्माण होणार नाही.











