लहान भाचीला नदी घाटावर घेऊन गेलेल्या मामावर काळाने घाला घातला. भाची बुडत असल्याचे पाहून मामा वाचवायला गेला आणि वाहत्या पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
रमेश मारूती बुरूड (वय ४२, रा. वाकरे) असे मामाचे नाव आहे. भाचीला वाचवण्यात यश आले. पण, रमेश बुरूड यांची शोधमोहीम अंधार पडल्याने थांबवण्यात आली. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रमेश बुरूड हा शेतमजुरीचे काम करतो. रोहिणी सूर्यवंशी (रा. पलूस, जि. सांगली) येथील भाची व भाचा वाकरे येथे मामा रमेश बुरूडकडे सुट्टीला आले होते. त्यांना पोहायला शिकवण्यासाठी रमेश नदी घाटावर त्यांना सायंकाळी साडेचार वाजता घेऊन गेला होता. भाचीला पोहायला शिकवण्यासाठी पाठीवर पत्र्याचा डबा बांधून तिला पाण्यात पोहायला सोडले.
ती डब्ब्याच्या साह्याने पोहत नदीच्या मध्य भागापर्यंत पाण्यात गेली होती. पण, भोगावती नदीपात्रात धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याने जोरदार प्रवाहाने पाणी वाहात आहे. यामुळे भाचीच्या पाठीवरील डब्याने हेलकावे खाल्ल्याने ती भीतीने ओरडली. यामुळे तिला वाचवण्यासाठी रमेश तिच्याकडे गेला. पण, नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रवाही असल्याने रमेश त्यात वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आरडाओरडा झाल्याने आजूबाजूच्या शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांनी व सरपंच अश्विनी पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील याने रोहिणीला पाण्याबाहेर काढले. पण, शोधाशोध करूनही रमेश सापडला नाही. यामुळे तो पाण्यात वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याची माहिती पाटील मेंगाणे यांनी करवीर पोलिसांना दिली आहे.
सध्या उन्हाळा असल्याने लहान मुले व नागरिक दुपारी रखरखत्या उन्हात नदी, विहिरीत पोहण्यासाठी जात आहेत. पण, गेले दोन दिवस धरणातील पाणी भोगावती नदीत सोडल्याने पाण्याला प्रचंड वेग आहे. पोहायला जाणाऱ्या नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.











