महाराष्ट्रातील धडाकेबाज IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची प्रामुख्याने तरूणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यांची भाषणे, सोशल मीडियातील पोस्टला अनेकदा प्रचंड प्रतिसाद मिळतो.
यापार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये ना अन्य कुणाच्या नावाचा उल्लेख आहे, ना कुणावर थेट टीका आहे. पण कवितेच्या स्वरुपातील ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
भाकरी करपली… असे म्हणते विश्वास नांगरे पाटील यांनी सध्याच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य केल्याचा दावा सोशल मीडियातून केला जात आहे. हा दावा खोटा असल्याचे महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाने स्पष्ट केले आहे. विभागाने सोशल मीडियात केलेल्या पोस्टनुसार, याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
भाकरी करपली, भाकरी करपतच राहिली, असे म्हणत IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी व्यवस्थेवर भाष्य केल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या कोणत्याही भाषणात किंवा मुलाखतीत असे वक्तव्य केल्याचे आढळत नाही. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
भाकरी करपली. आचारी म्हणाला, ‘तवा बदला’! भाकरी पुन्हा करपली. आचारी म्हणाला, ‘पीठ बदला’! भाकरी तरीही करपलीच. आचारी म्हणाला, ‘पाणी बदला’! पुन्हा तेच… भाकरी पुन्हा करपलीच. आचारी म्हणाला, ‘चूल बदला’! तरीदेखील परिणाम शून्यूच. भाकरी करपतच राहिली. पण एकाची देखील ‘आचारी बदला’ म्हणण्याची हिंमत झाली नाही. हीच स्थिती सध्या देशाची झाली आहे.
‘डीजीआयपीआर’ची सोशल मीडियातील खुलासा करणारी पोस्ट विश्वास नांगरे पाटील यांनीही शेअर केली आहे. दरम्यान, सोशल मीडियात सध्या अनेक खोटा दावा करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. विविध सरकारी योजना, राजकीय नेते, अधिकाऱ्यांची विधाने, छायाचित्रे असलेल्या पोस्टच्या माध्यमातून खोटी माहिती पसरविली जात आहे. ‘डीजीआयपीआर’कडून याबाबत सातत्याने खोटे दावे खोडून काढले जात आहेत.











