मध्ये रेल्वे भरतीदरम्यान उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज कोर्टात हजेरी लावली. मुंबईत रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांनी राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
राज ठाकरेंच्या आदेशावरुनच ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी राज ठाकरेंनी आज ठाणे कोर्टात हजेरी लावली. यावेळी राज ठाकरेंनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे न्यायालयात उपस्थित राहिले असता मागील तारखेप्रमाणे त्यांनी यावेळी गुन्हा मान्य नसल्याचं सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 18 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे. यावेळी राज ठाकरेंना कोर्टात उपस्थित राहावं लागणार नसल्याचं वकिलांनी सांगितलं.
न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान विचारलं की, ज्याप्रकारे साक्षीदारांनी जवाब नोंदवलं, त्यामध्ये तुम्चाय मनसे कार्यकर्त्यांनी लाठी, काठी घेऊन उत्तर भारतीय परीक्षार्थीची जे रेल्वेची परीक्षा द्यायला आले होते त्यांना मारहाण केली. याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? यावर राज ठाकरेंनी हे खोटं आहे असं उत्तर दिलं.
त्यानंतर न्यायाधीशांनी सांगितलं की, ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्या खिशात मनसे पक्षाचं सदस्य कार्ड मिळालं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे का? त्यावरही राज ठाकरेंनी ‘हे खोटं आहे’ असं उत्तर दिलं. खोटी केस दाखल केली असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला.
न्यायाधीशांनी सांगितलं की, तुम्ही जे चिथावणीखोर भाषण केलं त्यामुळे हे सगळं घडलं असं जबाबात आहे. त्या भाषणाची सीडी मिळवण्याचा प्रयत्न केला ती मिळाली नाही. त्यावरही राज ठाकरेंनी, ‘हे खोटं आहे, मी येथे नव्हतोच मी बाहेर होतो’ असा दावा केला.
न्यायाधीशांनी तुम्हाला या केसबद्दल काही आणखी बोलायचं आहे का? असं विचारलं. त्यावर राज ठाकरेंनी उत्तर दिलं की, “20 वर्ष झाले केस ला, मी त्यावेळी इथे नव्हतोच मी नाशिकला होतो”.










