May 14, 2026 3:06 am

फुले विचारांचा गौरव; ‘राष्ट्र पितामह’ म्हणून महात्मा फुलेंचा गौरव

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई, (प्रतिनिधी) : गांधी आणि आंबेडकर या दोन्ही चळवळींचा पाया महात्मा फुले यांनी रचला. या देशाची स्वातंत्र्य चळवळ आणि सामाजिक न्यायाची चळवळ फुले विचारांचीच अपत्ये आहेत. गांधीजी जसे राष्ट्रपिता तसे महात्मा फुले देशाचे (भीष्म) पितामह ठरतात, असं प्रतिपादन कपिल पाटील यांच्या निबंध पुस्तिकेत करण्यात आलं आहे.

ज्येष्ठ नाटककार, पत्रकार ज्ञानेश महाराव, ज्येष्ठ साहित्यिका आशालता कांबळे, पत्रकार मृणालिनी नानिवडेकर, वंचितच्या नेत्या उत्कर्षा रूपवते आणि राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर यांच्या हस्ते या पुस्तिकेचं प्रकाशन झालं.

महात्मा जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ हा किताब मुंबईकर जनतेने 11 मे 1888 रोजी दिला होता. त्याचं निमित्त साधत 11 मे 2026 रोजी प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमीत ‘धन्य जोतीबा’ हा श्रीनाथ म्हात्रे आणि सहकारी यांचा सांगीतिक कार्यक्रम पार पडला.

राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक, कार्यकर्ते आणि सत्यशोधक चळवळीतील नेत्यांचे आताच्या पिढीतील वंशज आवर्जून उपस्थित होते. मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्था, माळी मिशन, संत शिरोमणी सावता माळी मंडळ, कित्ते – भंडारी मंडळ, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज, तसेच कुणबी, आगरी, कोळी, नाभीक, परीट, पद्मशाली तेलगू समाज यांचे प्रतिनिधी तसेच राज्य सरकारी कर्मचारी संघटना, हिंद मजदूर किसान पंचायत, मुंबई लेबर युनियन, दी म्युनिसपल युनियन, सफाई कामगार, माथाडी कामगार, शिक्षक भारती या संघटनांच्या नेत्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

फुलेंचा अखंड गात समितीचे निमंत्रक ज्ञानेश महाराव म्हणाले, जात-पात, अंधश्रद्धा आणि विषमतेच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र विचारांची समाजरचना उभी करणे, हीच फुले विचारांची खरी दिशा.

यावेळी बोलताना समितीचे निमंत्रक कपिल पाटील यांनी सांगितलं, स्वातंत्र्य चळवळीचं नि:संशय नेतृत्व महात्मा गांधींनी केलं. गांधी स्वत: फुलेंना महात्म्यांचे महात्मा म्हणतात. पण लोकमान्य टिळक, अ‍ॅनी बेझंट आणि काँग्रेस यांनी स्वराज्याची मागणी करण्याआधी महात्मा फुलेंनी स्वातंत्र्यांची गरज प्रतिपादत, ते खेचून घ्यावं लागेल हे सर्वप्रथम सांगितलं. देशातील सामाजिक क्रांतीची आणि स्त्री मुक्तीची ज्योतही फुलेंनीच पेटवली. म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना बुद्ध, कबीरांच्या सोबत गुरु मानत होते.

कार्यक्रमाचे संयोजन राजा कांदळकर, रोहित ढाले आणि श्रीनाथ म्हात्रे यांनी केले. विश्वास काटकर, सुभाष मळगी, सुरेश ठाकुर, संजीव पुजारी, रमाकांत बने, अरुण रांजणे, दीपक भालेराव हे कामगार नेते आणि भालचंद्र नलावडे, मारूती कुदळे, मलविंदरसिंग खुराना, जयवंत पाटील, सच्चिदानंद शेट्टी, हाजी जतकर, राजहंस टपके, ताप्ती मुखोपाध्याय, अशोक बेलसरे, सुभाष मोरे, कैलास गौड, देवीदास हटकर, राजू जांगळे, फरीद खान राजश्री भानजी, वर्षा कांबळे, कल्पना शेंडे, नंदा कांबळे, गोपीनाथ लोखंडे, मोनिका काळे, सागर भालेराव हे समाज नेते यावेळी उपस्थित होते. समितीच्या ‘धन्य जोतीबा’ हा कार्यक्रम राज्यभर नेण्यात येईल, असे ढाले यांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!