महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्यावर्षी त्यांच्या मुलीचा साखरपुडा शाही थाटात पार पडला होता.
आता उद्या, ३ मे रोजी, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात हा भव्य विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.
इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी तब्बल १०० एकर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. लाखो लोक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, हा विवाह सोहळा राज्यातील सर्वात चर्चित कार्यक्रमांपैकी एक ठरणार आहे.
राजकीय आणि धार्मिक दिग्गजांची उपस्थिती
या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय विविध संत-महंतांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, विवाह सोहळ्याच्या दिवशीच त्याच ठिकाणी गगनगिरी महाराज सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळाही पार पडणार आहे. त्यामुळे धार्मिक वातावरणात हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचे चित्र आहे.
गेल्यावर्षी इंदुरीकर महाराज यांनी मुलीचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात केला होता. त्या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
मात्र, “लग्न साधं करा” असा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी स्वतःच मुलीचा साखरपुडा भव्य पद्धतीने केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
या टीकेमुळे इंदुरीकर महाराज काही काळ व्यथित झाले होते. वैयक्तिक टीकेचा मानसिक परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. इतकेच नव्हे, तर त्यांनी कीर्तनसेवा थांबवण्याचे संकेतही दिले होते.
दरम्यान, एका कीर्तनात त्यांनी टीकाकारांना थेट उत्तर देताना ठाम भूमिका मांडली. “लग्न आणखी जोरात करणार, काय बोंबलायचंय बोंबला,” असे म्हणत त्यांनी टीकाकारांना आव्हान दिले होते.
तसेच, राजकीय कार्यक्रमांवर होणाऱ्या खर्चावरही त्यांनी भाष्य करत, “मोठ्या सभांसाठी होणाऱ्या खर्चाबाबत कोणी प्रश्न विचारत नाही,” अशी टीका केली होती.
आता उद्या होणाऱ्या या भव्य विवाह सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साखरपुड्याप्रमाणेच हा विवाहही मोठ्या थाटामाटात पार पडणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
एकीकडे भव्य तयारी, तर दुसरीकडे आधी झालेली टीका. या दोन्ही गोष्टींमुळे इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा विवाह सोहळा राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.











