संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले विधेयक मंजूर होऊ शकले नाही. यामुळे भाजपाने देशभरात विरोधकांविरोधात मोर्चे, निदर्शने केली.
मुंबईतील वरळी येथे भाजपाने काढलेला मोर्चा एका महिलेमुळे चांगलाच गाजला. दक्षिण मुंबईच्या महत्त्वाच्या भागात मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्याबद्दल एका महिलेने जोरदार त्रागा केला. भाजपाचे पदाधिकारी, पोलीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनाही महिलेने खडे बोल सुनावले होते. आता या महिलेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एका व्हिडीओ संदेशाद्वारे त्यादिवशी काय झाले? ही महिला कोण? तिची पार्श्वभूमी काय? याबद्दलची सर्व माहिती समोर आली आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दलही या महिलेने टिप्पणी केली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने या महिलेच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर केला आहे. “तुम्ही काही दिवसांपूर्वी २१ एप्रिल रोजी काळी टोपी घातलेल्या एका महिलेचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. महिला मोर्चात ती वाहतूक कोडींबाबत प्रश्न विचारत होती. ती महिला मीच आहे. माझे नाव टीना चौधरी असून काही गोष्टींचे स्पष्टीकरण देण्यासाठी मी हा व्हिडीओ करत आहे”, अशी सुरुवात करत सदर महिलेने सर्व घटनाक्रम सांगितला.
“त्या घटनेनंतर माझ्याविषयी काळजी व्यक्त करणारे अनेक मेसेजेस मला आले. मी सर्वांना सांगू इच्छिते की, मी ठीक आहे. तुम्ही जी काळजी व्यक्त केली, त्याबद्दल सर्वांची आभारी आहे. त्यादिवशी (२१ एप्रिल) मी माझ्या मुलीला ४ वाजता म्युझिक क्लाससाठी सोडले. तिला परत आणण्यासाठी मी ४:४५ घरातून निघाले. पण मोर्चामुळे मी वाहतूक कोंडीत अडकले. जवळपास २५ मिनिटे मी गाडीतच होते. गाडी हलत नसल्यामुळे मी बाहेर येऊन काय चालले आहे, हे पाहण्यासाठी गेले. तेव्हा कळले की, आमच्या पुढ उभ्या असलेल्या बस पार्किंग केल्या होत्या. त्या तिथून हलतच नव्हत्या”, अशी सुरुवातीची माहिती चौधरी यांनी दिली.
टीना चौधरी पुढे म्हणाल्या, “पुढचा अर्धा तास मी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला जाऊन त्या बस काढण्यासंदर्भात विनंती करत होते. पण कुणीही मला दाद देत नव्हते. कुणी माझे ऐकतही नव्हते. मी जी बाटली फेकली ती कुणा मोर्चेकरी किंवा पोलिसावर फेकली नाही. तर फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी ती कृती केली. कारण मी रस्त्याच्या पलीकडे उभी होते आणि माझ्या कमरेपर्यंत दुभाचक होता.”











