अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुण्याला जात असताना रस्त्यात अडचणीत सापडली आहे. पुण्याला जायला निघालेल्या सोनालीला रात्री रस्त्यात अशा परिस्थितीचा सामना करावा लागला की तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.ज्यात तिने परिस्थिती भयंकर आहे, आमच्यासाठी प्रार्थना करा, असं म्हणत मदतही मागितली आहे.
सोनाली पुण्याला निघाली आणि ती मानखुर्द ब्रीजवर आली. तिथूनच तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत ती सांगते की, “मी पुण्याला निघाले, मानखुर्द ब्रीजवर आले. पण आम्ही आता इथंच अडकलो आहोत” सोनालीने व्हिडीओ पोस्ट केला तेव्हा 5 तास झाले होते. इतके तास आम्ही इथंच अडकलो आहोत असं ती म्हणाली.
पुढे तिने सांगितलं की, “आम्ही ट्रॅफिक कंट्रोल टिमला फोन केला. त्यांनी आम्हाला सांगितलं की पेशन्स ठेवा, खूप बेकार परिस्थिती आहे, ही वाहतूक कोंडी कधी सुटेल हे त्यांनाही माहिती नाही”
“माझ्या मागे आणि पुढे ट्रॅफिक पाहू शकता”, असं म्हणत सोनालीने या व्हिडीओत ट्रॅफिकही दाखवलं आहे. “आम्ही रस्ता ओलांडून पलीकडे जाऊ शकत नाही आणि मागेही जाऊ शकत नाही”, असं ती म्हणाली.
पुढे ती “आमच्यासाठी प्रार्थना करा, मदत करा”, असं म्हणते. “पोलिसांनो तुम्ही दुसऱ्या मार्गाने आमच्यापर्यंत पोहोचू शकत असाल, तुम्हाला काहीही माहिती असेल ती आम्हाला देऊ शकत असाल, पुढे काय परिस्थिती आहे ती सांगू शकत असाल, आम्हाला मदत करू शकत असाल तर प्लीज करा”, असं ती सांगते.
“भूक वगैरे लागली असं मी म्हणणार नाही. कारण मला माहिती आहे की काही लोक यापेक्षाही भयानक परिस्थितीतून गेले आहेत. पण 5 तास एकाच ठिकाणी, हे खूप भीतीदायक आहे”, असं ती म्हणाली.
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये अभिनेत्री मुग्धा गोडबोलेनेही ट्रॅफिकबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. लोणावळ्याजवळील आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर उलटला होता. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातानंतर तब्बल 27 तासांहून अधिक काळ ट्रॅफिक जॅम कायम होता. रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी तासंतास अडकून पडले होते.
यावर मुग्धाने पोस्ट केली होती. त्यात ती म्हणाली, “भयंकर आहे. गेली तीस वर्ष मी सातत्याने हा प्रवास करते आहे. वेगवेगळ्या वाहनांमधून करते आहे. बस, ट्रेन, टॅक्सी, गाडी यापैकी त्या त्या वेळी जे सोयीचं असेल ते. सुरुवातीला 5-6 तास लागायचे. मध्ये कधीतरी तो ‘द्रुतगती’ झाला. टोलची रक्कम वाढणं, वाढत जाणं, पण रस्ता तितका चांगला न राहणं, चालकांनी नियम न पाळणं. त्याबद्दल कुणीही काहीही न करणे. कधीही कोणतीही सूचना न देता लेन्स बंद असणे. घाटात ट्रॅफिक जॅम असणे. ट्रक्स आणि टेम्पोने तिन्ही लेन्स ब्लॉक करून ठेवणं, रस्त्याचे पदर वाढवायचे.. म्हणून टोल वाढवायचा.. तरीही हे असं कसं होतं??
“बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल. गाडीत लहान मुलं, म्हातारी माणसं, आजारी माणसं, गरोदर बायका असतील. लोकांच्या visa appointments गेल्या, विमानं चुकली, प्रचंड आर्थिक नुकसान झालं.. हे वेळीच थांबवता आलं नसतं का? निर्णय घेऊन damage कमी करता आला नसता का? याला कोण जबाबदार आहे??”, असा सवाल तिने उपस्थित केला होता.











