महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढवतील, अशा चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र, या सर्व अटकळींना पूर्णविराम देत पक्षाने अंबादास दानवे यांना अधिकृत उमेदवार घोषित केले.
उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाचे माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कौतुक करत, त्यांनी पदाचा मोह न ठेवणारा नेता असल्याचे म्हटले आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पदाला चिकटून न राहण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमदारांनी विश्वासघात केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद टिकवण्याऐवजी त्याग केला आणि शासकीय निवासस्थानही सोडले. आजही त्यांनी स्वतः निवडणूक लढवण्याऐवजी पक्षातील प्रभावी आवाज असलेल्या अंबादास दानवे यांना उमेदवारी देऊन नेतृत्वाचा वेगळा आदर्श ठेवला आहे, असंही प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, सत्ता म्हणजे केवळ स्वतःला महत्त्व देणे किंवा पद मिळवणे नव्हे, तर योग्य वेळी इतरांना संधी देण्याची दूरदृष्टी असणेही तितकेच महत्त्वाचे असते. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयातून हेच दिसून येते.
प्रियंका चतुर्वेदी यांनी पोस्ट करत म्हटलं की, “पुन्हा एकदा, पक्षनेते Uddhav Thackeray ji, यांनी पदाला चिकटून न राहण्याची आपली भूमिका दाखवून दिली आहे. जेव्हा आमदारांनी गद्दारी केली, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपदाला चिकटून न राहता ते सोडले आणि अधिकृत निवासस्थानही रिकामे केले. आणि आज पुन्हा एकदा, सर्व पक्षांकडून बिनविरोध महाविकास आघाडीच्या एकमेव विधान परिषद सदस्यपदासाठी पाठिंबा असूनही, स्वतः उभे राहण्याऐवजी त्यांनी पक्षाचा बुलंद आवाज असलेल्या Ambadas Danve ji यांना उमेदवारी दिली.सत्ता म्हणजे स्वतःचे महत्त्व वाढवणे किंवा केवळ नेत्याचा दर्जा मिळवणे नव्हे; तर योग्य वेळी सत्ता इतरांकडे सोपवण्याची समज असणे होय.”











