रेल्वेच्या अजब गजब कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबलपूर-नांदेड एक्स्प्रेसमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासी प्लॅटफॉर्मवर पोहोचले, हातात कन्फर्म तिकीट होतं, पण जेव्हा ट्रेन आली तेव्हा प्रवासी चक्रावून गेले. ज्या डब्यात त्यांची सीट होती, तो अख्खा डब्बाच ट्रेनला जोडलेला नव्हता! रेल्वे डब्बा जोडायला विसरल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
५७ प्रवाशांची दैना, प्लॅटफॉर्मवर अफरा-तफरी
संबलपूर-नांदेड एक्स्प्रेस (गाडी क्र. २०८०९) संबलपूर स्थानकावर आली तेव्हा त्यात एक ‘एसी थ्री-टियर’ कोच कमी असल्याचे निदर्शनास आले. ज्या ५७ प्रवाशांचे या डब्यात कन्फर्म बुकिंग होते, त्यांची एकच धावपळ उडाली. तिकीट असूनही बसण्यासाठी डब्बाच नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. बराच वेळ प्रवाशांना काय करावे हेच सुचत नव्हते.
तांत्रिक बिघाडाचे कारण आणि तात्पुरती सोय
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रेल्वे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. ईस्ट कोस्ट रेल्वेने स्पष्टीकरण दिले की, तांत्रिक बिघाडामुळे तो आरक्षित डब्बा ट्रेनला जोडता आला नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने अतिरिक्त टीटीई तैनात करण्यात आले.. ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट होते, त्यांना ट्रेनमधील इतर डब्यांमधील रिक्त जागांवर तात्पुरते सामावून घेण्यात आले. रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानक कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना रेल्वेत चढण्यासाठी मदत केली.
विशाखापट्टणममध्ये अखेर डब्बा जोडला
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने विशाखापट्टणम स्थानकावर पर्यायी डब्बा जोडण्याची व्यवस्था केली. सुरुवातीचा काही प्रवास प्रवाशांना दाटीवाटीने किंवा इतर डब्यात करावा लागला असला, तरी विशाखापट्टणममध्ये नवा डब्बा जोडल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा हीच आमची प्राथमिकता असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले.











