जादा परताव्याचे आमिष दाखवून आणि विश्वास संपादन करून शहरातील अनेक नागरिकांना भिशीच्या जाळ्यात ओढत सुमारे २ कोटी ९९ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हा प्रकार २०१८ ते २०२५ या काळात घडला.नंदाबाई रमेश आधुडे (४५) आणि तिचा मुलगा सौरभ रमेश आधुडे (२१, दोघेही रा. व्यंकटेश पार्क, बीड बायपास, मूळ घनसावंगी) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी रविवारी (दि.१) दिली.
फिर्यादी जयश्री गजानन गिरी (४२, रा. मुकुंदवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बीड बायपास परिसरातील व्यंकटेश पार्क येथे राहण-ारी संशयित नंदाबाई रमेश आधुडे ही २०१४-१८ पासून भिशी चालवत होती. सुरुवातीला छोट्या रकमांच्या भिशी वेळेवर पूर्ण करून तिने महिलांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये तिने १२ लाख रुपयांची मोठी भिशी सुरू केली. जयश्री गिरी यांनी या भिशीत सहभागी होऊन २० महिने दरमहा ५० हजार रुपये याप्रमाणे १० लाख रुपये भरले.
यापूर्वीचे १० लाख आणि हे १० लाख मिळून त्यांचे एकूण २० लाख रुपये नंदाबाईकडे जमा होते. सन २०१८ पासून ते जुलै २०२५ पर्यंत या माय लेकांनी १५ हून अधिक लोकांना विश्वासात घेऊन एकूण २ कोटी ९९ लाख २० हजार रुपये जमा करून घेतले. मात्र भिशीची मुदत संपल्यानंतर जेव्हा गुंतवणूकदारांनी आपल्या पैशाची मागणी केली, तेव्हा नंदाबाई आणि सौरभ आधुडे यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जयश्री गिरी यांच्यासह इतरांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक संजय बहुरे करत आहेत.
सातवी पास नंदाबाईचा आलिशान बंगला
मूळची जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील असलेली नंदाबाई गेल्या १५ वर्षांपासून शहरात राहते. भिशीच्या नावाखाली तिने मोठी माया जमवली. त्यातून शहरात ७० लाखांचा आलिशान बंगला, तीन ते चार ठिकाणी मालमत्ता आणि गावात शेती घेतल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांनी पैसे मागितल्यास त्यांना उलट पोलिसांत खोट्या तक्रारी करण्याची भीती दाखवली जात होती, असे सूत्रांनी सांगितले.
साखळी पद्धतीने अनेकांना गंडा
जयश्री गिरी (२० लाख), प्रकाश रणमोडे (१४ लाख), नमिता बेंद्रे (१७.५० लाख), विलास माने (३० लाख), नंदा बेंद्रे (१५.५० लाख), चांद पठाण (८ लाख), सावित्री आघाव (१९.८० लाख), ज्योती घोलप (२.७० लाख), छाया चव्हाण (७.९० लाख), जिजा काळे (६.५० लाख), गुलाब राठोड (१५.५० लाख), कमलबाई सुरसे (२१.५० लाख), रंजना आघाव (१६.२० लाख), सपना मरकड (५० लाख), मीरा फलके (५० लाख), राम घायाळ (४ लाख) या सर्वांनी ६ लाख ९९ हजार ५०० ऑनलाईन, तर २ कोटी ९२ लाख २० हजार ५०० रोखीने आरोपी नंदाबाई आधुडे आणि तिचा मुलगा सौरभ यांच्याकडे जमा केले होते. इतर अनेक गुंतवणूकदारांची मोठी रक्कम या माय-लेकांनी हडप केल्याची शक्यता आहे.











