बनावट इसारपावती आणि तोतयागिरीच्या माध्यमातून ७० लाख रुपयांची फसवणूक करून गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात ब्रोकरला अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
राजू ऊर्फ कचरू विठ्ठल जाधव (रा. पाल, ता. फुलंब्री; सध्या रा. हर्सूल) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी (ता. ३०) हर्सूल टी-पॉइंट परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातील संतोष वैद्य यांची करमाड येथील ३ हेक्टर ८४ आर जमिनीच्या व्यवहारात ५० लाखांची फसवणूक झाली होती. तपासात समोर आले, की आरोपीने मूळ मालक पुरुष असताना त्यांच्या जागी बनावट महिलांना उभे करून व्यवहार केला होता. तसेच, दक्षिण भारतीय नावांची सरमिसळ करून फसवणुकीचा कट रचला होता. दुसऱ्या एका प्रकरणात शारदा रंगदास यांचीही २० लाखांची फसवणूक याच पद्धतीने करण्यात आली होती.
आंतरराज्य धागेदोरे
या गुन्ह्यात बनावट आधार कार्डचा वापर करून बनावट नावाने धनादेश स्वीकारले गेले. हे धनादेश बंगळूर येथील एका क्रेडिट सोसायटीमार्फत बेकायदेशीररीत्या वटविण्यात आले. याप्रकरणी संबंधित संस्थेच्या चालकावरही गुन्हा दाखल आहे. यापूर्वी आरोपीची पत्नी वैशाली जाधव हिला अटक झाली असून, तोतयागिरी करणारी तिरुपती येथील महिला ई. लता सुरेश (रा. तिरूपती, आंध्र प्रदेश) व इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
अनेक गुन्ह्यांत होता फरार
राजू जाधव हा केवळ करमाडच नव्हे, तर जालना जिल्ह्यातील कदीम जालना पोलिस स्थानकातही गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर व मधुकर मोरे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विना क्रमांकाची अॅक्टिव्हा दुचाकी व दोन मोबाईल असा २८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.











