मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून मुंबई महापालिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे, मुंबईतील ठाकरे बंधू काय बोलतात, काय आरोप करतात आणि काय विषय मांडतात याकडेही सर्वांचे लक्ष असते. त्यातच, राजठाकरेंनी मुंबई विमानतळ बंद करण्यात येऊन ती जागा हडपण्याचा डाव असल्याची शंका उपस्थित केली. राज ठाकरेंच्या या आरोपावर पहिल्यांदाच शिवसेना शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिवसेना प्रवक्ता प्रकाश महाजन यांनी पलटवार केला, मुंबईतील सांताक्रुज एअरपोर्ट बंद झाले, ते काय विकले का सरकारने? असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना विचारला.
राज ठाकरे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून, सांगतो तुमच्या डोक्यावर कोणी नाही म्हणून तुम्ही असे बेलगाम झाले आहात. मग, तुम्ही कशाला अमित शहा, सोनिया गांधी यांना भेटायला गेले होते. मुख्यमंत्री यांच्या पदाचा मान ठेवा, प्रत्येक पक्ष चालवण्याची एक पद्धत असते, असा पलटवार प्रकाश महाजन यांनी केला आहे. मुंबईतील सांताक्रुज एअरपोर्ट बंद झाले, ते काय विकले का सरकारने? कदाचित यांचे व्यवसाय बिल्डर असल्यामुळे त्यांचा डोळा त्या जागेवर असेल. सुगीत संधी ते शोधत आहेत, हे माहीत नाही, अशी प्रतिक्रिया गरिश महाजन यांनी दिली. बाळासाहेबच ब्रँड होते, त्यांच्या पुढची पिढी बोलताना ब्लँक होते, भविष्यात एक बोलेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि दुसरा बोलेल राज ठाकरे मुख्यमंत्री होतील काही सांगता येत नाही, असा टोलाही महाजन यांनी लगावला आहे.
लोकसंख्या वाढते आहे, याचा अर्थ तुम्ही रेल्वे येऊ देणार नाही हा काय त्यावर उपाय नाही. ब्रँड म्हणून काहीही बोलायचे नाही, तुम्ही पक्ष विकला, कित्येक निवडणुका अशा लढवल्या, अशीही टीका प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर केली.
ठाकरेंना चूक दाखवलेली आवडत नाही
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेवरूनही महाजन यांनी पलटवार केला. हे राजकीय विधान आहे, असा माझा अनुभव आहे, कोणत्याही ठाकरेला त्यांची चूक दाखवलेली अजिबात आवडत नाही. त्यांना सल्ला दिलेला देखील आवडत नाही, उद्धव ठाकरेंचे हे राजकीय विधान आहे. स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी, हे एक चावट विधान आहे, असे प्रकाश महाजन यांनी म्हटलं.
जे उद्धवला बोलता येत नाही ते याच्या तोंडात टाकून दिले जाते आता दोन्ही भावाचा संजय राऊत प्रवक्ता झाला आहे. शिवसेनेच्या वचनाला 2019 मध्ये तडा याचमुळे गेला, दोन्ही भावांमध्ये वितुष्ठ आणणारा हाच आहे. आता दोन्ही भावांना बोहल्यावर उभ्या करणारा हाच भटजी आहे, याच्या मनात सुप्त राग आहे. याच्या भावाला आणि याला कधीच केंद्रात आणि राज्यात मंत्री केले नाही, त्याचा राग याच्या मनात आहे आणि तो राग अशा पद्धतीने सगळ्यांचे कसे वाटोळे होईल हे पाहून संजय राऊत करतो आहे, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांच्यावर प्रकाश महाजनांनी केली.











