गरीबनगरवर कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केली जात असताना भाजपच्या नेत्यांनी झोपडीधारकांना ‘बांगलादेशी’ ठरवले. त्यावर झोपडीधारकांनी गुरुवारी तीव्र आक्रोश व्यक्त केला.
50-60 वर्षे आम्ही इथे राहतोय, मग आता बांगलादेशी कसे बनलो? आमच्याकडे आधार कार्ड, मतदार कार्ड हे सगळे पुरावे असून केवळ अपुऱ्या सर्वेक्षणामुळे बेघर झालो आहोत. स्वतःच्या राजकीय श्रेयासाठी बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमान ठरवून बदनाम करणार भाजप सरकारच चोर आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया झोपडीधारकांनी नोंदवल्या.
वांद्रे रेल्वे स्थानकाला खेटून उभ्या राहिलेल्या पाच ते सहा मजली बेकायदा झोपडय़ांवर कारवाई केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होत आहे. मात्र सत्ताधारी भाजपचे नेते राजकारणासाठी या कारवाईचे भांडवल करत असल्यामुळे झोपडीधारकांकडून गुरुवारी संतप्त प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. पिढ्यान्पिढ्या इथे राहत असताना आत्ताचे सत्ताधारी आम्हाला बांगलादेशी ठरवत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून 2017 मध्ये केलेले सर्वेक्षण अर्धवट ठेवल्यामुळे आम्ही घराच्या हक्काला मुकलो आहोत. याचा प्रशासनाने मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून गरीबनगर झोपडपट्टीचे फेरसर्वेक्षण करावे, अशी मागणी झोपडीधारकांनी केली.
आम्हाला बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमान म्हणून बदनाम करणारे भाजप सरकारच चोर आहे. जर सरकार चोर नसेल तर त्यांनी मूळ झोपडीधारकांना न्याय देण्यासाठी गरीबनगरचे फेरसर्वेक्षण करावे. – अनिसा शेख
2017 मध्ये आग लागली त्यावेळी रेल्वेच्या पुंपणामुळे आमच्यामध्ये दोन गट पडले. एका गटाने इतरांना विश्वासात न घेता सर्वेक्षण करून घेतले. त्यामुळे आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. – इम्तियाज अहमद शेख











