पुण्यात घुसखोर बांगलादेशी नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आहे. पुणे येथील बुधवार पेठ या रेड लाईट एरियामध्ये फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीये.
विशेष कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली असून, या महिला बेकायदेशीरपणे भारतात राहून देह व्यापार करत असल्याचं तपासात उघड झालं आहे. या महिलांकडे भारतात राहण्यासाठी कोणतेही वैध डॉक्युमेंट उपलब्ध नव्हते. तसेच पोलिसांनी दोन प्रश्न विचारले अन् बांगलादेशी महिलांची पोलखोल झाली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान काही ग्राहकांनी दिलेल्या माहितीमुळे पोलिसांचा संशय बळावला. या महिलांच्या बोलण्याची पद्धत आणि शब्द बांगलादेशी लोकांशी साधर्म्य दर्शवणारे होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली असता, या महिलांनी सुरुवातीला आपण पश्चिम बंगालच्या असल्याचा दावा केला होता. पण पोलिसांनी दोन प्रश्न विचारले अन् महिला बांगलादेशी असल्याचं सिद्ध झालं.
पोलिसांनी महिलांना प्रथम राष्ट्रगीत म्हणायला लावलं. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांचं नाव विचारलं, याचं उत्तर महिलांकडं नव्हतं. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालमधील आसपासच्या गावाची नावं विचारली, ती देखील त्यांना सांगता आली नाही. पाचही महिला समाधानकारक उत्तरे देऊ शकल्या नाहीत. यावरून त्या बांगलादेशी नागरिक असल्याचं स्पष्ट झालं अन् पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. फरासखाना पोलिसांनी रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बुधवार पेठ परिसरातील माचिस बिल्डिंग आणि इतर भागात सघन शोधमोहीम राबवली होती.
या महिलांनी सीमा ओलांडून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता आणि त्या स्वतःच्या इच्छेने या व्यवसायात सहभागी होत्या, असं डीसीपी ऋषिकेश रावले यांनी सांगितलं. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कारवाईत गेल्या 11 महिन्यांत तब्बल 95 बांगलादेशी नागरिकांना पुणे शहरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुण्यातून बांगलादेशी कधी हद्दपार होणार? असा सवाल विचारला जातोय.











