राज्यातील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपली परखडपणे भूमिका मांडली.
राजकारण, भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जवळीक, अशोक खरात प्रकरणावरही त्यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र-माझं व्हिजन या कार्यक्रमात प्रश्नांना उत्तरे दिली. ‘मी जे काही करतो ते मोकळेपणाने करतो, लपून-छपून काही करत नाही,’ असे म्हणत त्यांनी अशोक खरात (Ashok kharat) प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. आमदार दीपक केसरकर आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. कार्यकर्त्यांच्या आग्रहावरुन मी कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. मात्र, प्रत्येकाच्या कपाळावर कॅरेक्टर सर्टिफिकेट लिहिलेलं नसतं, असे शिंदेंनी म्हटलं.
अशोक खरातकडे तुमच्या पुजेसाठी आमदार दीपक केसरकर गेले होते, राधाकृष्ण विखे पाटलांनीही तेच म्हटलंय, असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला होता. त्यावर, मी करतो ते मोकळेपणाने करतो, मी लपून छपून काही करत नाही. मी शिर्डीत गेलो होतो, दोन मंत्री होते, मीडियाही माझ्यासोबत होता. एका कार्यकर्त्याने सांगितले, आता कुणाच्या कपाळावर काय लिहिलेलंय का? आपण काय कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतो का, असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला. तसेच, खरात हा माणुसकीला काळिमा आहे, अशा वृत्तीला थार देणार नाही, ती आमची वृत्ती नाही. खरातला त्याची सजा होणार, असेही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
भाजप आणि शिवसेना यांच्यात राजकीय शीतयुद्ध किंवा भाजपकडून अडथळे, कोंडी केली जात असल्याच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, ‘महायुती विजयी घोडदौड करत आहे. कुठे ना कुठे काही होतंच, पण माझा भर सकारात्मक कामावर आहे.’ तर उद्धव ठाकरे भाजपजवळ जात असल्याचे विचारले असता, ‘मला काय फरक पडतो? पण त्यांना जवळ तर घ्यायाला पाहिजे, असे उत्तर एकनाथ शिंदेंनी दिले.
राज्यात सुरू असलेल्या पायभूत सुविधांवर भाष्य करत, 1 मे रोजी मिसिंग लिंक हा ऐतिहासिक प्रकल्प सुरू होत आहे, लोकार्पण होत असल्याचं सांगताना समृद्धी महामार्गाच्या कामातील आठवणी आणि अनुभवही एकनाथ शिंदेंनी सांगितले. राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा आढावा घेताना शिंदे म्हणाले की, ‘येणाऱ्या काळात अभियांत्रिकीचा चमत्कार ठरेल असा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प उद्या उद्घाटनासाठी सज्ज आहे. या टनेलमुळे इंधन, वेळ आणि अपघातात मोठी बचत होईल.’ घाटातील प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोस्टल रोड, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, तसेच नवी मुंबई विमानतळासारखे प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहेत. ‘पूर्वी दीड तास लागणारा प्रवास आता 20 मिनिटांत पूर्ण होतो,’ असा दावा उपमुख्यमंत्री यांनी केला.











