वसई तालुक्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेला पालकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असताना. विरारमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत काही पाल्यांना लागलेली विरारमधील शाळा चक्क ५ वर्षांपासून बंद असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यामुळे पालकांकडून शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात आहे.
गरजू मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाकडून आरटीई प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबविली जाते. या प्रक्रियेंतर्गत शाळेतील २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. वसईत वर्ष २०२५-२६ साठी १५० शाळांमधील ४ हजार ५६ जागा या प्रक्रियेसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर पहिल्या फेरीत एकूण १ हजार ५४८ अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे.
एकीकडे शिक्षण विभागाकडून वसई तालुक्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया उत्तमरित्या सुरू असल्याचा दावा केला जात असताना विरारमध्ये मात्र अजब प्रकार उघडकीस आला आहे. विरार पश्चिमेतील विरार-नालासोपारा लिंक रोड परिसरात असणारी यश विद्या निकेतन ग्लोबल स्कूल ही शाळा काही विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत लागली आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावर जेव्हा पालकांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाळेला भेट दिली. तेव्हा मात्र ती शाळा करोना काळापासून बंद असल्याचे पालकांना सांगण्यात आले आहे.
आरटीई प्रक्रियेअंतर्गत आम्ही अर्ज भरला होता. यावेळी तीन किलोमीटरच्या अटीनुसार ही शाळा आम्हाला लागली. मात्र प्रवेश प्रक्रियेसाठी आम्ही जेव्हा या शाळेचे आलो. तेव्हा कळलं की ती शाळा गेल्या पाच ते सहा वर्षांपासून बंद आहे. याबाबत आम्ही जिल्हा शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्यापही ठोस असे मिळालेले नाही, अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे.
पालघर शिक्षण विभागाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही मुंबईतील आरटीई प्रमुखांना भेटलो. त्यांनी सांगितलं की पालघर मधील शिक्षणाधिकारी यांनी हस्तक्षेप केल्यास पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळू शकतो. तसेच विरारमधील इतर शाळांमध्ये चौकशी केल्यानंतर त्यांनीही जिल्हा शिक्षण विभागाकडून कोणते सूचना दर्शनाला आणि काहीच करू शकत नाही असे सांगितले असण्याची प्रतिक्रिया माधवी कोरडे यांनी दिली.
यासंबंधी जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर यांच्याशी संपर्क साधला असता, वसई तालुक्यातील या प्रकरणाबाबत तक्रार प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच याप्रकरणी वसई तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली असून अहवाल मिळाल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.
वसई विरारमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरळीतरित्या चालू असली तरी इतर ठिकाणांप्रमाणे इथेही पालकांकडून प्रवेश शुल्काची मागणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी जागा राखीव ठेवणाऱ्या शाळांना शासनाकडून अनुदान दिले जाते. मात्र, ते वेळेवर दिले जात नसल्यामुळे शाळांकडून प्रवेश शुल्काची मागणी केली जात आहे.











